Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाधवानी कृत्रिम बुद्धीमत्ता संस्थेमध्ये केलेले भाषण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाधवानी कृत्रिम बुद्धीमत्ता संस्थेमध्ये केलेले भाषण


महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे मंत्री विनोद तावडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे, रोमेश वाधवानीजी, सुनील वाधवानीजी, उपस्थिती बंधू आणि भगिनींनो, “वाधवानी कृत्रिम बुद्धिमत्ता” संस्थेचे आज उद्‌घाटन  करताना मला आनंद होत आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रामध्ये संयुक्तपणे कार्य करण्यासाठी मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्र सरकार आणि वाधवानी संस्था एकत्र आले आहेत, याबद्दल या सर्वांचे मी अभिनंदन करतो. या संस्थेचे कामकाज प्रत्यक्ष सुरू होत असल्याबद्दल रोमेशजी  वाधवानी आणि सुनीलजी  वाधवानी यांचे विशेष अभिनंदन! गरीबांच्या कल्याणासारखा एक उत्तम हेतू निश्चित करून, त्यासाठी विश्वस्तरावरील मापदंड दृष्टीसमोर ठेवून खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रामधील घटकांची भागीदारी असलेली ही संस्था म्हणजे एक आदर्श उदाहरण आहे.

गेल्या तीन साडे तीन वर्षामध्ये मी जगभरातील विविध ठिकाणी भारतासंबंधीच्या अनेक विषयांबाबत संवाद साधला. भारताचाही अशा वेगळ्या  विषयांमध्ये सहभाग असावा, असं मला मनापासून वाटतं होतं. ती इच्छा आता या संस्थेमुळे पूर्ण होणार आहे. रोमेशजी आणि सुनीलजी यांनी “कृत्रिम बुद्धिमत्ता” या विषयाला भविष्यामध्ये येणारे महत्व ओळखून, दूरदृष्टीने या संस्थेची उभारणी केली आहे. आगामी काळामध्ये या क्षेत्रात निर्माण होवू घातलेल्या स्पर्धेमध्ये आपला देशही तितक्याच क्षमतेने उभा राहिला पाहिजे, अशी भावनाही या संस्थेच्या उभारणीमागे आहे, याचे मला विशेष वाटते.

मित्रांनो, आज भारतीय अर्थव्यवस्था जगामध्ये सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आज आपण कृषी क्षेत्रापासून ते विमान उड्डाण शास्त्रापर्यंत तंत्रज्ञानाचा वापर करीत आहोत. यामध्ये अंतराळ मोहिमांचा समावेश आहे तसेच सामानाची घरपोच सेवा देण्यामध्ये तंत्रज्ञान  सामावलेले आहे. आपल्याकडे असलेले लहान- मोठे असंख्य उद्योग व्यवसाय तंत्रज्ञानाचा मोठ्याप्रमाणावर वापर करत आहेत. यामधून आगामी काळामध्ये चैाथी औद्योगिक क्रांती नक्की होणार असल्याचे हे संकेत आहेत.

मित्रांनो, कृत्रिम बुद्धिमत्तेबरोबरच “बोट्स आणि रोबोट्स” बरोबरच आपली उत्पादन क्षमता प्रचंड  प्रमाणामध्ये वाढेल, यामध्ये कोणतीच शंका नाही. परंतु या बरोबरच एका भीतीचा उगमही होणार आहे. ही मानवी मन आणि यंत्र यांच्यातली एक स्पर्धा असणार आहे. कोणत्याही नवीन गोष्टीला आधी विरोध करण्याचा मनुष्य स्वभाव आहे आणि यामध्ये वेगळं किंवा विचित्र असं अजिबात नाही. कोणत्याही काळात आणि कोणत्याही टप्प्यावर झालेल्या औद्योगिक, तंत्रज्ञानाच्या क्रांतीचं उदाहरण तुम्ही तपासून पाहा. आपल्याला अशा अनेक शंका आणि प्रश्नांना सामोरं जावंच लागलं आहे. यामुळेच भविष्याकडे नेणाऱ्या मार्गासमोर नेहमीच दोन पर्याय असतात. पहिला पर्याय आशा आणि अनेक आकांक्षा घेवून येतो तर दुसरा आहे ती व्यवस्था विचलीत होईल, थोडी गोंधळाची परिस्थिती निर्माण करेल, अशी भीती घेवून येत असतो.

तंत्रज्ञानामुळे सर्व क्षेत्रामध्ये विकासाची नवी आणि असंख्य दालने मुक्त झाली आहेत. अनेक संधी केवळ तंत्रज्ञानामुळे निर्माण झाल्या आहेत. जसजशी तंत्रज्ञानाची नवनवीन लाट येते, तसतशा अगणित संधी निर्माण होत आहेत. नवीन तंत्रज्ञान हे तुलनेनं जुन्या झालेल्या तंत्रज्ञानापेक्षा अधिकाधिक जास्त, नवीन संधी घेवून  येत आहेत. यामध्ये मनुष्याचा कस पणाला लागत असून भविष्यातही असेच घडणार आहे, याविषयी मला तरी काहीही शंका वाटत नाही. याबाबतीत मी अतिशय आशावादी आहे. या आशावादाचं मूळ माझ्या प्राचीन भारतीय विचारधारेमध्ये घट्ट रूजलेले आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांचा विचार केला तर दोन्हीही अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी, मानवाच्या एकोप्यासाठीच हातात हात घालून पुढे जाण्याची आवश्यकता आहे, असा आशावादी विचार मला भारतीय तत्वज्ञानाने दिला आहे.

या इथे मला यजुर्वेदामधल्या “तैतरेय आरान्यकाः”–“सत्ये सर्वम प्रतिष्ठितम” या ज्ञान सूक्ताचे स्मरण होत आहे. सत्याच्या मुळाशी जाण्यासाठी विज्ञानधिष्ठित  मार्ग अनुसरणे योग्य ठरणार आहे, असं आमच्या प्राचीन ग्रंथामध्ये नमूद करून ठेवले आहे.

आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये कोणत्याही सत्याचा शोध घेताना कोणत्या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे, याची एक सूचीच दिली आहे. सत्याचा वैज्ञानिकदृष्ट्या  शोध घेताना श्रध्दा, मेधा, मनीषा, मनसा, शांती, चित्त, स्मृती, स्मरण आणि विज्ञान आवश्यक आहे. इथे विज्ञान म्हणजे आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग करणे असा अर्थ अपेक्षित आहे.

अशा पद्धतीने आपण जर वैज्ञानिक पातळीवरून सत्याचा शोध घेवू लागलो, तर ते नक्की आपल्याला मिळते आणि मानवाच्या भल्यासाठी, कल्याणासाठी अशा सत्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत असतो. या दृष्टिकोनातून मी विकसित होत असलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा विचार करीत असतो. त्यामुळेच वैज्ञानिक आधुनिकता मला भविष्याविषयी नवा आशावाद देत असते.

कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्राला मानवी मूल्यांचा आधार देऊन समाज कल्याणाच्या हेतूने जर आपण या क्षेत्राचा विचार केला तर आपण कोणत्या उद्देशाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणार आहोत, त्यावर त्याचे यश-अपयश अवलंबून राहिल. प्रत्येक औद्योगिक क्रांतीच्या टप्प्यावर नवीन तंत्रज्ञानाचे मापदंड अनेकपटींनी वाढले आहे. याचाच अर्थ माणसानं तंत्रज्ञानाच्या जोरावर, मदतीने, विज्ञान- तंत्रज्ञानाचा आधार घेवून मोठी प्रगती साधलीच परंतु माणसावर तंत्रज्ञानाचा पगडा अधिकाधिक घट्ट झाला आहे, हे आपण नाकारू शकत नाही. तंत्रज्ञानामुळे किती प्रगती होवू शकते,  हे आजच्या विकासाने दाखवून दिले आहेच. आता यापुढे तंत्रज्ञानावर होत असलेला खर्च कितीही  वाढला तरी तो समाजामध्ये अंतर वाढवणारा ठरणारा नाही. कारण आमचे सरकार “सबका साथ, सबका विकास” या तत्वावर कार्यरत आहे. या सरकारचा पायाच मुळात सर्वांचा विकास साधण्यावर भर देण्याचा आहे.

मित्रांनो, मानवी क्षमता आणि माणसांच्या मर्यादा अधिकाधिक वाढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अतिशय उपयोगी ठरते, हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे अशा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात संपूर्ण विश्वाचे मार्गदर्शक आपण बनू शकतो का याचा विचार आपण केला पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता असलेला यंत्रमानव बनवताना आपण त्याच्यातील मानवी क्षमता आणि त्याच्यातील दुर्बलता कमी करून तो अधिक शक्तीशाली कसा बनेल याचा प्रामुख्याने विचार करून संशोधन केले जाते, तसंच माणसातले दुर्गण वजा करता तो अधिकाधिक संपन्न, सक्षम माणूस बनणं तसंच गरजेचं आहे, यामुळे चांगली, उच्च मानवी मूल्ये जपली जाणार आहेत.

मित्रांनो, आपल्या समोर सध्या असलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरं देण्याचं काम कृत्रिम बुद्धिमत्ता करणार आहे, असं आपण म्हणतो. यामध्ये महत्वपूर्ण भूमिका आहे ती, प्रचंड माहितीसाठी आणि माणसाची समज, माणसाचं ज्ञान या गोष्‍टींची;  या ज्ञानामुळंच कृत्रिम बृद्धिमत्ता आपल्याला उपयुक्त ठरणार आहे.

भारतामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तयार झाली पाहिजे आणि त्याच बरोबर कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग प्रामुख्याने भारताला झाला पाहिजे.

भारतापुढे असलेल्या आव्हानांचा विचार करा आणि त्यावर कृत्रिम बुद्धिमत्ता कशाप्रकारे उपयोगी ठरू शकते, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने या प्रश्नांची सोडवणूक कशी होवू शकते,  यासाठी पर्याय शोधून काढा, अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आपल्या देशामध्ये विपूल वैविध्यता आहे. मुख्य दहा भाषा आणि शेकडो पोटभाषा आपल्याकडे बोलल्या जातात. या भाषांमधील विविधता पाहिली तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने देशभरातील अनेक भाषांमध्ये संवाद आणि संपर्क व्यवस्था अतिशय सुलभ आणि सोप्या पद्धतीने कसे होवू शकेल, यावर चांगला तोडगा आपण काढू शकतो. आपल्या समाजामध्ये असलेले दिव्यांग एकप्रकारे आपली मालमत्ता आहेत, असा माझा विश्वास आहे. हे मी नेहमीच सांगत आलो आहे. त्यांना सक्षम करणे, स्वावलंबी बनवणे देशाचे काम आहे. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता नक्कीच वापरता येवू शकते.

कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून, रोबोटच्या मदतीने   दिव्यांगांची क्षमता आपण वाढवू शकणार आहोत का? त्यांच्यामध्ये ज्या अव्यक्त संभावना आहेत, त्यांना आपण ख-या   अर्थाने न्याय देवू शकणार आहोत का? शिक्षक आणि विद्यार्थ्‍यांची संख्या यांच्यातील विषम गुणोत्तर भरून काढण्यासाठी कृत्रिम बृद्धिमत्तेचा वापर होवू शकणार आहे का? अशा पद्धतीने याकडे पाहिले तर आपल्याकडे देशभरामध्ये प्रत्येक विद्यार्थ्‍यांला दर्जेदार शिक्षण मिळू शकणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग आपल्याला देशाच्या कानाकोप-यामध्ये दर्जेदार आरोग्यसेवा पुरवण्यासाठी कसा होवू शकेल.ग्रामस्थांना होत असलेल्या गंभीर शारीरिक आजारांची माहिती पुरेशी आधी मिळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होवू शकेल का? त्याच बरोबर आपल्या शेतकरी बंधूंना कोणत्यावेळी कोणते पीक घ्यावे, सध्या कोणत्या पिकासाठी हवामान योग्य आहे आणि नेमकी कधी पेरणी करावी, इतर कृषी कामे कशी, कधी करावीत, याचा निर्णय घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होवू शकेल का?

मित्रांनो, एकविसाव्या युगामध्ये तंत्रज्ञानाची असलेली अफाट आणि  अमर्याद शक्ती देशातलं दारिद्रय आणि अनारोग्य संपुष्टात आणण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, असं आमच्या सरकारला वाटते आणि   आम्ही हे करू शकतो असा आमचा ठाम विश्वासही आहे. तंत्रज्ञानाची तशी मदत घेवूनच आपण आपल्याकडे असलेली गरीबी दूर करू शकणार आहेत आणि समाजातील तळागळातील घटकाचा विकास करू शकणार आहेत. विशेष म्हणजे आम्ही हे ध्येय गाठण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि म्हणूनच आम्ही डिजिटल भारत अभियान सुरू केलं आहे. भारताला डिजिटली साक्षर करून सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचा, पारदर्शक  अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. यासाठी भारत-नेट अंतर्गत आम्ही देशातले प्रत्येक खेडे ब्रॉड-बँडने जोडत आहोत. प्रत्येक गावाला ब्रॉड बँड उपलब्ध करून देत आहोत. अशा पद्धतीने डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण केल्यामुळे देशाच्या विकासाचा कणा मजबूत होण्यास मदत होत आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने सेवा प्रदान करणे सोईचे ठरत आहे.

याबरोबरच केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कौशल्य विकास अभियानाचा उद्देश महत्वाचा ठरतो. आगामी काही दशकांमध्ये विश्वस्तरावर आवश्यक असलेल्या कुशल मनुष्य बळाचा विचार करून आम्ही कुशल मनुष्य बळ निर्मितीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार योजना तयार केली. नवउद्योजकांनी नवनवीन उद्योग सुरू करावेत म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही अटल नवकल्पना मोहीम सुरू केली. जागतिक दर्जाचा विचार करुन नव उद्योजकांनी नवकल्पनांचा पाठपुरावा करावा, त्यांना त्यासाठी चांगले व्यासपीठ मिळावे, तंत्रज्ञानाची जोड देता यावी, उद्योगापुढे असलेली आव्हाने पेलता यावीत, आणि वेगवेगळी “स्टार्ट-अप” सुरू करून स्व-रोजगार निर्मितीक्षम कार्य करावे. या नवउद्योजकांनी नवतंत्रज्ञानाचा प्रामुख्याने वापर करावा, या गोष्टींचा विचार करून देशभरातील शाळांमध्ये ‘अटल टिंकरिंग लॅबोरॅटरीज’ सुरू केल्या आहेत. यामुळे देशभरामधल्या कोट्यवधी शालेय विद्यार्थ्‍यांना युवा संशोधक बनण्याची प्रेरणा, प्रोत्साहन मिळाले आहे. विद्यार्थ्‍यांनी नवनवीन कल्पनांचा तंत्रज्ञानाच्या मदतीने पाठपुरावा करावा, असा विचार या मोहिमेमागे आहे. आपल्या समाजातल्या लोकांसाठी उपयुक्त ठरतील असे प्रकल्प,नवतंत्रज्ञानाच्या आधारे राबवावेत असेही सरकारला वाटत आहे.

मित्रांनो, या संस्थेमध्ये कार्यरत असणारे शास्त्रज्ञ, संशोधक आणि संस्थेचे निर्माते आपल्या समाजातील सर्वसामान्य लोकांसाठी लाभदायक, लोकोपयोगी कार्य करतील आणि  केलेल्या अमूल्य कामामुळे लोकांच्या  हृदयामध्ये त्यांना एक अढळ स्थान प्राप्त होईल, असा मला विश्वास आहे. आपण करीत असलेल्या सर्व प्रयत्नांना मी शुभेच्छा देतो. लोककल्याणासाठी, जनहितासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर किती उत्कृष्टपणे, जबाबदारपणे  आणि  अतिशय सुरक्षितपणाने केला जावू शकतो, याचे आदर्श उदाहरण भारत या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण विश्वापुढे ठेवू शकेल, अशी आशा करतो.

आज या वेगळ्या  क्षेत्रात कार्य करू इच्छित असलेल्या संस्थेचे उद्‌घाटन करताना मला अतिशय आनंद होत आहे. आपल्या समाजातील लोकांसाठी कार्य करण्यासाठी ही संस्था कटिबद्ध राहील, अशी आशा व्यक्त करतो.

धन्यवाद!

B.Gokhale/S.Bedekar