Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी इकॉनॉमिक टाईम्स जागतिक व्यवसाय शिखर परिषदेला केले संबोधित


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथे ‘नव अर्थव्यवस्था – नवीन नियम’ या संकल्पनेवरील इकॉनॉमिक टाईम्सच्या जागतिक व्यवसाय शिखर परिषदेला संबोधित केले.

आगामी काही महिन्यात केंद्र सरकार 4 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचे सांगून पंतप्रधानांनी आता स्पष्ट बदल दिसून येत आहेत, असे स्पष्ट केले. आर्थिक आणि सामाजिक संबंधांमधील बदल हे नव भारतासाठीच्या नव्या नियमांचे आणि अर्थव्यवस्थेचे सार आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

गेल्या 4 वर्षात ‘5 नाजूक अर्थव्यवस्थेपैकी एक’ अशी भारताची ओळख बदलली असून, पाच ट्रिलियन डॉलर’च्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य साधणारा भारत अशी झाली आहे. संपूर्ण जगाच्या विकासात भारत महत्वपूर्ण भूमिका कशी बजावत आहे, हे विषद करणारी आकडेवारी पंतप्रधानांनी सादर केली. जागतिक सकल घरेलू उत्पन्नात भारताच्या वाट्यात 2013च्या 2.4 टक्क्यांवरुन 2017 मध्ये 3.1 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. विविध सूक्ष्म आर्थिक मापदंडात भारत अधिक चांगली कामगिरी बजावत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

नवीन कार्य संस्कृती आणि नवीन दृष्टीकोन यामुळे हा बदल घडून आल्याचे ते म्हणाले. आज संपूर्ण जग भारताच्या नव्या स्पर्धात्मकतेला प्रमाणित करत आहे.

या आधीच्या जागतिक व्यवसाय शिखर परिषदेत भाग घेतला होता, तेव्हा वस्तू सेवा कर ही शक्यता होती, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, आता हे सत्यात उतरले आहे. यामुळे अधिक चांगली कर प्रणाली आणि चांगली महसूल प्रणाली निर्माण झाली आहे. यावेळी पंतप्रधानांनी नादारी आणि दिवाळखोरी कायद्याचाही उल्लेख केला.

सरकारच्या पुढाकाराच्या यशस्वीतेसाठी वेग, स्तर आणि संवेदनशीलता महत्वाची असते, असे त्यांनी सांगितले. पायाभूत सुविधा क्षेत्रातल्या वाढत्या गतीबद्दल त्यांनी काही उदाहरणे दिली.

पायाभूत सुविधा, कृषी, तंत्रज्ञान, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात अभूतपूर्व गुंतवणूक होत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

आरोग्य क्षेत्रातल्या ‘मिशन इंद्रधनुष्य’, ‘जन औषधी दुकाने’ आणि ‘आयुष्यमान भारत’ या नवीन पावलांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला.

100 कोटी बँक खाती, 100 कोटी आधारकार्ड आणि 100 कोटी मोबाईल फोन ही त्रिसूत्री जगात आतापर्यंत न दिसून आलेली अर्थप्रणाली निर्माण करेल, असे डिजिटल इंडिया मिशन बद्दल बोलतांना पंतप्रधान म्हणाले. एमएसएमई क्षेत्राबाबतच्या पुढाकाराचाही त्यांनी उल्लेख केला.

इकॉनॉमिक टाईम्सच्या या आधीच्या भाषणात ‘सर्वांसाठी घरे, सर्वांसाठी वीज, सर्वांसाठी सुरक्षित स्वयंपाक, सर्वांसाठी आरोग्य तसेच सर्वांसाठी विमा’ या बद्दल बोललो होतो, असे त्यांनी सांगितले. ‘घर बांधणी, सौभाग्य योजना, उज्वला योजना आणि विमा क्षेत्र’ या संदर्भात उचललेल्या पावलांची त्यांनी माहिती दिली. गरीबांच्या सक्षमीकरणाबाबतच्या सरकारच्या लक्ष्याबाबत बोलतांना पंतप्रधानांनी शौचालय बांधण्याचा, तसेच मुद्रा योजनेअंतर्गत कर्जवाटप आणि मृदा आरोग्य कर्जांच्या वाटपाचाही उल्लेख केला. अर्थसंकल्पातील किमान आधारभूत किंमतीच्या घोषणेचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला.

विविध आर्थिक संस्थातील कायदे आणि मूल्य पाळले जात आहेत की नाहीत याची जबाबदारी असणाऱ्या सर्वांनी विशेषत: ज्यांच्यावर पर्यवेक्षणाची जबाबदारी आहे, त्यांनी संपूर्ण समर्पित भावनेने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. आर्थिक बाबींसंदर्भातल्या गैरव्यवहारांबाबत सरकार कठोर कारवाई करेल, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. ‘नव अर्थव्यवस्था नवीन कायदे’ यांचा हा मूलमंत्र आहे, असेही ते म्हणाले.

S.Tupe/J.Patankar/D.Rane