Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अहमदाबाद येथे भारताच्या पहिल्या अतिजलद रेल्वे प्रकल्पाच्या भूमीपूजन समारंभात सार्वजनिक सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

अहमदाबाद येथे भारताच्या पहिल्या अतिजलद रेल्वे प्रकल्पाच्या भूमीपूजन समारंभात सार्वजनिक सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

अहमदाबाद येथे भारताच्या पहिल्या अतिजलद रेल्वे प्रकल्पाच्या भूमीपूजन समारंभात सार्वजनिक सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

अहमदाबाद येथे भारताच्या पहिल्या अतिजलद रेल्वे प्रकल्पाच्या भूमीपूजन समारंभात सार्वजनिक सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण


जपानमधून आलेले काही विशेष पाहुणे आणि या ठिकाणी या ऐतिहासिक प्रसंगी उपस्थित असलेले सर्व मान्यवर,

माझे अतिशय जवळचे मित्र ॲबे-सान यांचे मी भारतात आणि विशेष करून गुजरातच्या भूमीवर पुन्हा एकदा खूप-खूप मनापासून स्वागत करत आहे.

गुजरातीतून…..

(अने मारे तमने पण बधाने अभिनंदन आपवा छे. विश्वना एक नेताने,जापानना प्रधानमंत्रीने अने भारतना परम मित्रने अने मारा अंगत मित्रने,जे रीते तमे स्वागत सम्मान कर्युं, गईकाल जे द्रश्य बताया जे वातावरण बनाव्युं हुं हृदयपूर्वक सौ गुजरातवासीओनो आभार मानुं छुं।)

मित्रांनो, कोणताही देश अर्धवट अपूर्ण संकल्प आणि बंधनात अडकून राहिलेल्या स्वप्नांच्या साथीने कधीही पुढे जाऊ शकत नाही. स्वप्नांच्या कक्षांचा विस्तारच कोणत्याही देशाची, कोणत्याही समाजाची, कोणत्याही व्यक्तीची आकाशाच्या दिशेने झेप निश्चित करण्याचे सामर्थ्य राखून असतो. हा “न्यू इंडिया” आहे आणि याच्या स्वप्नांच्या कक्षांचा विस्तार, त्याची झेप असीम आहे, इच्छाशक्ती अमर्याद आहे.

आज भारताने आपले अनेक वर्षांपासून बाळगलेले एक जुने स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. मी देशाच्या सव्वाशे कोटी देशवासीयांना मुंबई-अहमदाबाद अति जलद रेल्वे मार्गिकेच्या या भूमीपूजनाच्या प्रसंगी कोटी कोटी शुभेच्छा देत आहे आणि अभिनंदन करत आहे. बुलेट ट्रेन प्रकल्प एक असा प्रकल्प आहे जो जलद गती, वेगवान प्रगती आणि त्याबरोबरच वेगवान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जलद परिणाम देखील घेऊन येणार आहे.

ज्यामध्ये सोयीसुविधा आहेत, सुरक्षितता देखील आहे. जो रोजगार आणेल आणि गती देखील आणेल. जो मानव स्नेही देखील आहे आणि पर्यावरण स्नेही देखील आहे. आजचा दिवस जपान आणि भारताच्या नातेसंबंधांसाठी ऐतिहासिक आणि तितकाच भावनोत्कट क्षण आहे.

एक चांगला मित्र नेहमीच काळ आणि सीमा या बंधनांच्या पलीकडे असतो आणि जपान ने दाखवून दिले आहे की तो भारताचा कसा घनिष्ठ मित्र आहे, जो काळ आणि सीमांच्या पलीकडे आहे. मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान भारताची पहिली अति जलद रेल्वे मार्गिका, दोन्ही देशांच्या बळकट होत जाणा-या संबंधांचे एक उमदे उदाहरण आहे, प्रतीक आहे. जर आज इतक्या कमी वेळेत या प्रकल्पाचे भूमी पूजन होत असेल तर त्याचे सर्वात मोठे श्रेय माझे सर्वात जिवलग मित्र ॲबे सान यांना जात आहे. शिंझो ॲबे यांनी या प्रकल्पात कोणतेही अडथळे येणार नाहीत याची व्यक्तिगत स्वरुपात काळजी घेतली.

मित्रांनो, मानवी संस्कृतीच्या विकासाचा , वाहतुकीच्या साधनांशी अतिशय जवळचा संबंध आहे आणि आपण आशियाई संस्कृतीचे बारकाईने निरीक्षण केले तर आपल्याला असे दिसेल की त्या काळात गावे, शहरे आणि लोक नदीच्या काठालगत वसले होते आणि हीच ती क्षेत्रे होती जी विकासाची केंद्रे बनत होती, त्यानंतर रस्ते विकासाचे माध्यम बनले आणि ज्या ज्या भागातून महामार्ग गेले त्या त्या भागात शहरे वसू लागली आणि आता पुढची विकासाची पिढी त्याच ठिकाणी असेल जिथे अतिजलद मार्गिका असतील.

मित्रांनो, कोणत्याही देशाच्या विकासात वाहतूक प्रणाली अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते, मग ती रेल्वे असो, रस्ते असोत, जलमार्ग असोत किंवा हवाई मार्ग असोत. ही वाहतूक प्रणाली देशांतील भागांना एकमेकांशी जोडले जाण्याचा पाया बनते आणि एकमेकांच्या संपर्कात येण्याचा फायदा देशातील जनतेला विविध प्रकारे मिळत असतो, अनेक प्रकारे मिळत असतो. ज्यांना अमेरिकेच्या इतिहासाची माहिती आहे, त्यांना हे माहिती असेल की रेल्वे आल्यानंतर कशा प्रकारे अमेरिकेने प्रगतीचे नवे युग सुरू केले. आताच आमचे परम मित्र ॲबे- सान सांगत होते की दुस-या महायुद्धानंतर जपानची स्थिती कशी झाली होती, किती भयानक आयुष्य होते, किती गरिबी होती. पण 1964 मध्ये जपानमध्ये बुलेट ट्रेन सुरू झाली आणि मग या तंत्रज्ञानाचा विस्तार हळहळू जगातील पंधरा देशात झाला आणि त्यामुळे जपानच्या अर्थविश्वात बदल झाला. आज युरोपपासून चीनपर्यंत याची छाया दिसून येते. अतिजलद रेल्वेने या देशांमध्ये केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक परिवर्तन आणण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तेव्हापासून आतापर्यंत काळ खूपच बदलला आहे आणि यासाठीच प्रयत्न करण्याच्या पद्धतीतही बदल होणे गरजेचे आहे. काळानुरूप लहान लहान प्रयत्न करण्यात आले आहेत. नव्या गोष्टींचा समावेश झाला आहे. पण आता काळ हळूहळू पुढे सरकण्याचा राहिलेला नाही. काळ कोणाचीच वाट पाहत नाही. तंत्रज्ञानात 100 वर्षात झाला नसेल इतका बदल गेल्या 25 वर्षात झाला आहे. आता इतक्या वेगाने जर बदल होणार असतील तर संपर्कव्यवस्थेवरून पुढे जाऊन अतिवेगवान संपर्कव्यवस्था प्रस्थापित करण्याला आपले प्राधान्य आणि भर आहे. अतिजलद दळणवळण व्यवस्थेमुळे वेग वाढेल अंतर कमी होईल, आर्थित प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध होतील. मित्रांनो, कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रगतीचा थेट संबंध असतो तो उत्पादकतेशी. जेव्हा उत्पादकता असेल तेव्हाच विकास होईल. आपला भर आहे तो अतिवेगाने प्रस्थापित होणा-या संपर्कव्यवस्थेद्वारे अधिकाधिक उत्पादकतेवर.

मित्रांनो, या प्रसंगी मी जपानच्या आणखी एका मित्रत्वाच्या भावनेची विशेष प्रशंसा करत आहे. आम्हा भारतीयांमध्ये आणि विशेषकरून आम्हा गुजराती आणि अहमदाबादी लोकांमध्ये कधीही वस्तूच्या खरेदीचा किंवा विक्रीचा विषय निघतो तेव्हा बरोबर तोलून मापून हिशेब लावला जातो, एका एका पैशाचा हिशेब ठेवला जातो. फायदा आणि तोट्याचे रंग-रुप अगदी तपासून पाहिले जाते. जेव्हा आम्ही अगदी एक लहानशी बाइक जरी खरेदी करायला गेलो आणि बँकेतून कर्ज घ्यायचे झाले तरी बँकेच्या दहा चकरा मारत राहतो. एका बँकेत दहा-दहा वेळा जातो आणि सर्वात कमी व्याजदरात कोण कोण कर्ज देईल, त्याचे हिशेब करत राहतो. एखादी बँक 8 टक्के सांगते, एखादी बँक 9 टक्के सांगत असेल आणि मग आम्ही त्याची आकडेमोड करत हिशेब करत राहतो की इतके टक्के व्याजाने जर मी बाइक खरेदी करतो आणि जर बँकेला व्याजासकट पैशाची परतफेड केली तर त्यावेळी माझ्या बाइकची किंमत काय असेल? किती वर्षांनी ती होईल? याची फार बारकाईने पडताळणी करत राहतो. बँकवाले देखील थकून जातील इतक्या वेळा आपण त्यांच्या दारी जात आणि जरा बघा ना काही कमी करता आले तर… 8 टक्क्यांवर नाही घेऊ शकत 9 टक्क्यांवर नाही घेऊ शकत जरा कमी करा. अर्धा टक्का जरी कोणी कमी करत असेल तरी आपल्याला आनंद होतो. आपल्याला हे चांगल्या प्रकारे ठाऊक आहे आणि अहमदाबादी लोक तर कदाचित खूपच चांगल्या प्रकारे जाणून असतील. पण मित्रांनो जरा कल्पना करा की असा मित्र, अशी बँक भारताला नाही मिळू शकत, जसा ॲबे-सान यांच्यासारखा मित्र मिळाला आहे, जपानसारखा मित्र मिळाला आहे. व्याज न देताच कर्ज घ्या आणि दहा, वीस नाही तर पन्नास वर्षात चुकते करा, असे कोणी सांगितले तर कोणाचा विश्वास बसेल? लोकांना अशी बँक नाही मिळणार, पण भारताला असा मित्र मिळाला आहे ज्याने बुलेट ट्रेनसाठी 88 हजार कोटी रुपये, एटी एट थाऊजंड क्रोर रुपीज केवळ 0.1 टक्के व्याजदराने या बुलेट ट्रेनसाठी द्यायचा निर्णय घेतला आहे.

मला खरोखरच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मी गुजरातमध्ये होतो तेव्हा बुलेट ट्रेनविषयी बोलायचो तर मला विचारले जायचे की मोदी बोलत असतात, बुलेट का आणायची, केव्हा आणायची, केव्हा आणायची, केव्हा आणायची? आता जेव्हा आणण्याची सुरुवात केली तर म्हणतात कशाला आणता? बंधु भगिनींनो, ही बुलेट ट्रेन जपानने भारताला दिलेली सर्वात मोठी भेट आहे. एका प्रकारे हा प्रकल्प मोफत बनत आहे आणि मी जपानचे पुन्हा एकदा खूप खूप आभार मानतो. जो या प्रकल्पासाठी तंत्रज्ञान आणि आर्थिक साहाय्याच्या माध्यमातून भारताच्या सहकार्यासाठी आज आपल्या सोबत राहिला आहे, पुढे आला आहे.

बंधू आणि भगिनींनो या अतिजलद रेल्वे प्रणालीने दोन स्थानांमधील अंतर कमी होणार आहे, किंबहुना पाचशे किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या शहरातील लोक देखील आणखी जवळ येणार आहेत आणि जवळीक निर्माण होणार आहे आणि म्हणूनच मी तर असे सांगेन ही ट्रेन आमरु अहमदाबाद पासून आमची मुंबईपर्यंत जाणार आहे. जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा मुंबई आणि अहमदाबादमधील अंतर दोन ते तीन तासांत कापता येणे शक्य होईल. जर आपण याची तुलना हवाई प्रवासाशी केली तर जितका वेळ विमानतळावर जायला लागतो आणि तिथल्या सर्व औपचारिक प्रकिया पूर्ण करायला लागतो आणि विमानप्रवासानंतर तुम्हाला तुमच्या कार्यालयात पोहोचायला जितका वेळ लागतो, त्या वेळेच्या निम्म्या वेळेत तुम्ही या अतिजलद रेल्वे गाडीने मुंबईला जाऊ शकाल. किती मोठा बदल घडून येईल, याची तुम्ही कल्पना करू शकता. मुंबई- अहमदाबाद दरम्यान रस्त्याने जाणा-या मार्गावर ज्या हजारो गाड्या रोज चालवल्या जातात, त्यातही कपात होईल आणि याचा पर्यावरणावरही सकारात्मक परिणाम होईल आणि जेव्हा इंधनात बचत होईल तेव्हा परकीय चलनाचीही बचत होईल कारण आपल्याला सर्व इंधन परदेशातून आयात करावे लागते.

मित्रांनो, या प्रकल्पाबरोबरच मुंबई-अहमदाबाद मार्गावर एक नवी आर्थिक प्रणाली देखील विकसित होणार आहे. दोन्ही शहरांच्या दरम्यान संपूर्ण भाग एका प्रकारे एकेरी आर्थिक क्षेत्रामध्ये परिवर्तित होणार आहे. अतिजलद मार्गिकेमुळे केवळ प्रवासाचाच वेग वाढणार नसून व्यापाराला देखील चालना मिळणार आहे. जास्तीत जास्त क्षेत्रांचा परस्परांशी संपर्क वाढणार आहे आणि यामुळे मनुष्यबळाची देवाणघेवाण असो, सामानाची वाहतूक असो, हे सर्व अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने होत जाणार आहे. यामुळे देशाचा विकासही होईल आणि मी यापूर्वी जसे म्हटले होते की देशाला एक नवी गती प्राप्त होईल.

एक प्रकारची मानसिकता तयार झाली आहे की जे काही नवे तंत्रज्ञान दाखल होते ते केवळ श्रीमंतांसाठी असते, प्रत्यक्षात या तंत्रज्ञानाने मिळणार अनुभव वेगळाच असतो. तंत्रज्ञानाचा वापर गरिबांच्या सक्षमीकरणासाठी केला तर गरिबी विरोधातील संघर्षात आपल्याला खूपच लवकर विजय मिळवता येईल आणि म्हणूनच आपले हे उद्दिष्ट आहे की या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून ते इतके किफायतशीर बनवायचे की देशातील गरिबांच्या आयुष्याचा तो एक भाग बनेल. मला असे वाटते की तंत्रज्ञानाचा फायदा तेव्हाच मिळतो जेव्हा देशातील सर्वसामान्य नागरिक देखील त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करू लागतो. आज जेव्हा आपल्या रेल्वेत नव्या अत्याधुनिक गोष्टींचा समावेश होऊ लागला आहे तेव्हा आमचा संपूर्ण प्रयत्न असा आहे की देशातील सर्वसामान्य व्यक्तीला नव्या तंत्रज्ञानाचा फायदा मिळाला पाहिजे. या प्रकल्पादरम्यान तंत्रज्ञान हस्तांतरणामुळे रेल्वेला फायदा होणार आहे. या मार्गिकेच्या क्षेत्रातील तंत्रज्ञ, व्हेंडर, उत्पादक यांना देखील त्याचा फायदा मिळणार आहे आणि एका बाजूला जे संपूर्ण जाळे आहे रेल्वेचे, त्या जाळ्याला नावीन्याच्या दिशेने पुढे घेऊन जावे लागणार आहे आणि त्याचा फायदा त्याला होईल.

मित्रांनो, तंत्रज्ञान जरी आपल्याला जपानकडून मिळणार असले तरी बुलेट ट्रेनसाठी बहुतेक संसाधने भारतातच उपलब्ध केली जाणार आहेत आणि म्हणूनच आपल्या उद्योगांना देखील जागतिक दर्जाच्या उपकरणांची निर्मिती करावी लागणार आहे आणि त्याच वेळी त्यांचा पुरवठा देखील करावा लागणार आहे. झिरो डिफेक्ट. झिरो इफेक्ट म्हणजेच कोणताही दोष नसलेली आणि विपरित परिणाम नसलेल्या उत्पादन पद्धतीवर भर द्यावा लागणार आहे. यामुळे मेक इन इंडियाला देखील बळकटी मिळणार आहे. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगारांच्या संधी देखील हा प्रकल्प आपल्या सोबत घेऊन येत आहे.

मित्रांनो, देशात एकात्मिक वाहतूक प्रणाली ही “न्यू इंडिया”ची गरज आहे. “न्यू इंडिया”चे स्वप्न आहे आणि म्हणूनच आम्ही देशाचे भविष्य सुरक्षित करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. जेणेकरून भावी पिढ्यांच्या गरजा विचारात घेऊन पायाभूत सुविधांची निर्मिती केली जाऊ शकेल. रेल्वे असोत, महामार्ग असो, जलमार्ग असोत किंवा हवाई मार्ग असोत, आपण सर्व क्षेत्रात एकसमान पायाभूत सुविधांवर भर दिला आहे आणि अभूतपूर्व गतीने कामे करत पुढे चाललो आहोत. आपण पूर्वीपेक्षा जलद गतीने रस्ते बांधत आहोत. जीएसटीचा फायदा देशातील वाहतूक प्रणालीलाही मिळाला आहे आणि ट्रकद्वारे दररोज कापले जाणारे अंतर तीस टक्क्यांनी वाढले आहे. पूर्वी माल घेऊन जाणारा ट्रक एका दिवसात जर 200 किलोमीटर अंतर कापत असायचा तर आता जीएसटी आल्यावर हाच ट्रक 200 किलोमीटर ऐवजी 250 किलोमीटर अंतरापेक्षाही जास्त अंतराचा प्रवास एका दिवसात करू लागला आहे. म्हणजेच संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये 30 टक्क्यांची वाढ एकमेव जीएसटीच्या निर्णयामुळे शक्य झाली आहे.

सरकार जलमार्गांना परिवहनाच्या पर्यावरणाशी अनुकूल पद्धतीने विकसित करण्यासाठी देखील वचनबद्ध आहे. याच दिशेने पुढे वाटचाल करताना 106 नद्यांना राष्ट्रीय जलमार्गांच्या रुपात विकसित करण्याचे काम आम्ही याच दिशेने पुढे नेत आहोत. भारतातील हवाई वाहूतक क्षेत्र नव्या संधी घेऊन येत आहे.

गेल्या तीन वर्षात स्थानिक हवाई प्रवाशांच्या संख्येत, विमानाने प्रवास करणा-यांच्या संख्येत सुमारे तीन कोटी प्रवाशांची वाढ झाली आहे. हवाई वाहतूक क्षेत्राला मजबूत बनवण्यासाठी पहिल्यांदाच राष्ट्रीय हवाई वाहतूक धोरण आम्ही तयार केले आहे. मध्यमवर्गाच्या आयुष्यात ‘उडान योजना’ या योजनेच्या माध्यमातून बदल आणला जात आहे. या योजने अंतर्गत देशातल्या 70 लहान शहरांना जोडले जात आहे जेणेकरून देशातील सर्वसामान्य नागरिक देखील या स्वस्त हवाई सेवांचा लाभ घेऊ शकेल.

सद्यस्थितीतील रेल्वे व्यवस्था सुधारण्यावर आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे रेल्वेचे नवे जाळे निर्माण करणे या दोघांवरही समान लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. आम्ही रेल्वे रुळ, त्यांचे दुपदरीकरण, विद्युतीकरण या कामांना देखील अतिशय जलद गतीने पुढे नेले आहे आणि पूर्वीपेक्षा जास्त जलद गतीने कामे होत आहे. जितकी गुंतवणूक सरकारने रेल्वेमध्ये केली आहे तितकी गुंतवणूक यापूर्वी कधीही झाली नव्हती. गुंतवणूक वाढवण्याबरोबरच आता अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना पूर्ण करण्यावर देखील भर दिला जात आहे. भारतीय रेल्वेच्या क्षमतेत वाढ आणि मालवाहतूक सहजतेने करण्यासाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे.

मुंबईच्या जवाहरलाल नेहरू बंदरापासून यूपीच्या दादरी पर्यंत पश्चिम क्षेत्राची विशेष मालवाहतूक मार्गिका तयार केली जात आहे. याच प्रकारे कोलकात्यापासून ते लुधियानापर्यंत पूर्वाभिमुख विशेष मालवाहतूक मार्गिका तयार केली जात आहे. हे प्रकल्प पुढील तीन वर्षात पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यावर जी वाहतूक कोंडी आहे ती कमी होईल, प्रवासी रेल्वेगाड्यांचा वेळ वाचेल आणि रेल्वेची मालवाहतुकीची क्षमता वाढेल.

मित्रांनो, अतिजलद रेल्वे प्रकल्प आधुनिक रेल्वे निर्मितीच्या दृष्टिकोनाचा अविभाज्य भाग आहे. या प्रकल्पाचे आज भूमीपूजन झाले आहे याचा मला अतिशय आनंद होत आहे आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, माझ्या प्रिय देशवासीयांनो, भूमीपूजन आज झाले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे उलटून गेली आहेत. साबरमती आश्रमाची शताब्दी साजरी करत आहोत. मनात इच्छा आहे, स्वप्ने आहेत, जेव्हा स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होतील 2022-23 मध्ये, तेव्हा रेल्वेचे हे काम पूर्ण होईल आणि जसे ॲबे-सान यांनी सांगितले की आम्ही दोघे बसून यात प्रवास करून त्याचे उद्घाटन करू. जपान आणि भारताने जर एकदा ठरवले तर हे देखील आम्ही करून दाखवू अशी ग्वाही मी तुम्हाला देत आहे.

या प्रकल्पाबरोबरच अतिजलद रेल्वे तज्ञ तयार करण्यासाठी वडोदरा येथे अतिजलद रेल्वे प्रशिक्षण संस्थेची स्थापना केली जात आहे. हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा असल्याचे मला वाटत आहे. वडोदरा अनेक वर्षांपासून रेल्वेचे एक अतिशय महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. आता जपान या ठिकाणी अतिजलद रेल्वेसाठी ज्या प्रकारे मनुष्यबळाची गरज आहे, नवे तंत्रज्ञान शिकवण्याची आवश्यकता आहे, भारताच्या तरुणांना विशेषतः गुजरातच्या तरुणांना ही संधी मिळणार आहे आणि जेव्हा मनुष्यबळ कौशल्य विकास होते तेव्हा देशाची ताकद कैक पटींनी वाढते. जी एका अतिजलद रेल्वेने देखील होते आणि हे काम आता बडोद्याच्या भूमीवर होणार आहे, जपानच्या मदतीने होणार आहे आणि ती आधुनिक रेल्वे अभियांत्रिकीची कामे आहेत, त्यासाठी भारताच्या तरुणांना तयार केले जात आहे. तुम्ही कल्पना करू शकता की नव्या भारतासाठी किती मोठ्या सामर्थ्यवान मनुष्यबळाला तयार करण्याचे काम या एका संस्थेद्वारे होणार आहे. माझ्यासाठी या अतिजलद रेल्वे प्रकल्पाचे भूमीपूजन जितके महत्त्वाचे आहे त्यापेक्षाही जास्त महत्त्व देशातील तरुणांना हे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी उभारल्या जाणा-या या संस्थेच्या भूमीपूजनाचे आहे आणि 21व्या शतकासाठी भारताचा पाया भक्कम करण्याचे काम यामुळे होणार आहे.

मी या प्रकल्पाशी संबंधित भारत आणि जपानच्या सर्व प्रतिनिधींचे, कर्मचा-यांचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा प्रकल्प इथपर्यंत पोहोचला आहे. मला पूर्ण विश्वास आहे की ते एकत्रितपणे या प्रकल्पाला कमीत कमी वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. पुन्हा एकदा जपानचे पंतप्रधान आणि माझे प्रिय मित्र श्रीयुत शिंझो ॲबे, श्रीयुत ॲबे-सान यांचे मी मनापासून आभार मानतो आणि भारताचे रेल्वेचे जाळे इतके मोठे आहे, इतके मोठे आहे की जपानची जी एकूण लोकसंख्या आहे. आमच्याकडे एका आठवड्यात जपानच्या एकूण लोकसंख्येइतके लोक रेल्वेचा प्रवास करतात. केवढी विशाल असलेली ही क्षमता आहे. आमच्याकडे वाव आहे, गती आहे. तुमच्याकडे कौशल्य आहे आणि आम्ही एकत्रितपणे या नव्या भारताला नवी गती देण्याच्या दिशेने पुढे जाऊ.

मी पुन्हा एकदा गुजरातच्या नागरिकांनी जे भव्य स्वागत सन्मान केला. जपानच्या पंतप्रधानांचे त्यांना साजेसे स्वागत केले यासाठी गुजरातचे मनापासून आभार मानतो. मी गुजरात आणि महाराष्ट्र सरकार दोघांनाही शुभेच्छा देतो. या कामासाठी या दोन्ही सरकारांनी मिळून, भारत सरकार आणि जपान सरकारसोबत मिळून संपूर्ण काम अतिजलद गतीने केले आणि सर्व प्रकारची व्यवस्था केली आणि म्हणून मी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे देखील मनापासून आभार मानतो.

खूप खूप धन्यवाद.

B.Gokhale/S.Patil/Anagha