Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उत्तर प्रदेशातल्या झांसी इथं विविध विकास कामांचे लोकार्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

उत्तर प्रदेशातल्या झांसी इथं विविध विकास कामांचे लोकार्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

उत्तर प्रदेशातल्या झांसी इथं विविध विकास कामांचे लोकार्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

उत्तर प्रदेशातल्या झांसी इथं विविध विकास कामांचे लोकार्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण


माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,

आज संपूर्ण देश खूप उद्विग्न आणि अतिशय दुःखी आहे. आत्ता इथं उपस्थित असलेल्या सर्व लोकांच्या भावना मला खूप चांगल्या ठावूक आहेत. तुम्हाला काय वाटतंय, हे मला नेमकं समजतंय. पुलवामामध्ये जो दहशतवादी हल्ला केला गेला, त्यामुळे प्र्रत्येक भारतीय आज आक्रोश करत आहे. आमच्या शूरवीर जवानांनी देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यांचं बलिदान कदापि व्यर्थ जाणार नाही. हा विश्वास मी या झांशीच्या भूमीवरून देत आहे. ही भूमी वीरांची आणि वीरांगनांची आहे. याच भूमीवरून मी 130 कोटी हिंदुस्तानींना भरवसा देत आहे.

आमच्या लष्कराच्या जवानांचे शौर्य, त्यांचा पराक्रम देशाने पाहिला आहे. आणि आमच्या सेनेच्या शौर्यावर आणि सामथ्र्यावर अगदी कणभर अविश्वास दाखवू शकणारी एकही व्यक्ती आज आमच्या देशात असू शकत नाही. संपूर्ण देशाना लष्कराच्या सामथ्र्यावर आणि शौर्यावर खूप गाढ, चांगला विश्वास आहे. पूर्ण भरवसा आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आज इथं आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, यापुढे जी काही कारवाई करायची आहे, कोणत्या वेळेस कारवाई करायची आहे, कोणत्या स्वरूपामध्ये या कृत्याला उत्तर द्यायचे आहे, याचे सर्व निर्णय सुरक्षा दलाने घ्यावेत, याचे पूर्ण स्वांतत्र्य आपल्या सरकारनं सुरक्षा दलाला दिलं आहे. पुलवामा हल्ला करणारे गुन्हेगार, पुलवामा हल्ल्याचा कट रचणारे या सर्वांना त्यांच्या कृत्याची जरूर शिक्षा मिळेल. भारतामधलं सरकार हे नवीन ध्येय धोरणानुसार चालणारं सरकार आहे. येथे नव्या रितीनं कारभार चालतो, याचं  आपल्या  शेजारी देशाला विस्मरण झालं आहे. दहशतवादी संघटना आणि त्यांचे बोलवते धनी यांनी जे राक्षसी कृत्य घडवून आणले आहे, त्याचा पूर्ण हिशेब चुकता करण्यात येईल.

मित्रांनो? आपला शेजारी देशाची आर्थिक परिस्थिती सध्या अगदी डबघाईला आली आहे. आर्थिकदृष्ट्या त्यांचा अतिशय वाईट काळ सुरू आहे. त्याचबरोबर अशा कृत्यांनी हा देश सर्वांपासून तुटला आहे. त्यांची परिस्थिती इतकी बेकार झाली आहे की, अनेक मोठमोठे देश त्यांच्यापासून दूर राहणं पसंत करीत आहेत. त्यांच्यासाठी रोजचा खर्च भागवणंही खूप कठीण झालं आहे. मदत मिळावी म्हणून कटोरा घेवून देशोदेशी फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. परंतु आज जगातल्या कोणत्याही देशाकडून त्यांना मदत मिळणे अवघड झाले आहे. अशा आर्थिकदृष्ट्या वाईट काळात पुलवामासारखे हल्ले करून आणि भारताचे नुकसान करून भारताची परिस्थितीही ढासळेल, असा विचार आपला शत्रू देश करत असेल आणि पाकिस्तानामध्ये बसलेल्या लोकांनी अगदी चांगल्या पद्धतीने लक्षात घ्यावं की, तुम्ही जो दहशतवादाचा मार्ग स्वीकारला आहे, त्या मार्गावरून तुमचाच सत्यानाश होणार आहे. या मार्गामुळे स्वतःचा विनाश पाहणे, हेच तुमचे भविष्य आहे. संपूर्ण दुनिया आमची दिवसा दुप्पट आणि रात्री चैपट प्रगती होत असल्याचे सध्या पहात आहे. मात्र तुमचा विनाश आता सर्वांना पहायला मिळेल.

बंधू- भगिनींनो, आमच्या शेजारी देशाचे जे मनसुबे आहेत, त्याला आता माझ्या देशाचे 130 कोटी लोक एकत्र येवून सडेतोड प्रत्युत्तर देतील.

मित्रांनो, आज संपूर्ण जगभरातले मोठ मोठे देश भारताच्या बाजूने उभे आहेत. भारताच्या भावनांचे, मतांचे समर्थन करीत आहेत. माझ्याकडे जगभरातून येत असलेल्या संदेशांवरून हे घटनेमुळे ते सुद्धा किती दुःखी झाले आहेत, त्याच बरोबर हे कृत्य घडवून आणणा-यांविषयी त्यांचाही किती संताप होत आहे, हे लक्षात येत आहे. संपूर्ण विश्वामधून दहशतवाद्यांची पाळंमुळं कायमची उखडून टाकावी, अशी भावना व्यक्त होत आहे.

मित्रांनो, वीर कन्या आणि वीर पुत्रांची ही भूमी आहे. शत्रूने कितीही कट कारस्थाने केली तरी, त्याचा सामना कसा करायचा, हे या भूमीला, इथल्या वीर लोकांना चांगले माहीत आहे. माता भारतीचे रक्षण करणे, तिच्या अपत्यांचे रक्षण करणे आमच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे आहे, असे या भूमीच्या साक्षीने मी इथं नमूद करतो.

मित्रांनो, ही भूमी मनकर्णिकेच्या शौर्याची भूमी आहे. या भूमीने झांशीच्या राणीच्या रूपाने देशाच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये, त्या आंदोलनामध्ये एक नवा उत्साह निर्माण केला होता, नवी प्रेरणा दिली होती. मणिकर्णिका ही काशीची कन्या होती, आणि माझ्या भाग्यामुळे तिथल्या लोकांनी, काशीने मला आपलंसं केलं आहे. मला त्यांनी आपला संसद प्रतिनिधी बनवलं. त्यामुळेच मणिकर्णिकेची जन्मभूमी आणि माझी कर्मभूमी असलेल्या या बुंदेलखंडाविषयी आपोआपच एक विशेष स्नेहभावना निर्माण झाली असून या स्नेहाच्या धाग्याने मी सुद्धा जोडला गेलो आहे. बुंदेलखंडाने राष्ट्रभक्तीपासून ते देशाच्या आस्थेपर्यंत प्रत्येक वेळी एक नवी उंची गाठली आहे. अशी ही आगळी वेगळी भूमी आहे. मी ज्यावेळी अगदी पहिल्यांदा आपल्याला भेटायला आलो होतो, त्यावेळी आपल्याबरोबर एक वायदा केला होता, त्याची मला चांगली आठवण आहे. मी त्यावेळी म्हणालो होतो की, आपण सर्वजण मला इतके प्रेम देत आहात, हीच स्नेहभावना मी अगदी व्याजासह आपल्याला परत करेन. आपल्याला हे आठवतंय की नाही? मी हे बोललो होतो, स्मरणात आहे ना आपल्या? तुम्ही देत असलेले प्रेम व्याजासह मी जरूर परत करेन, असंच म्हणालो होतो, आठवतंय ना? आम्ही केलेला वायदा पूर्ण करणारे लोक आहोत. आम्ही एखादा निर्धार करून वाटचाल सुरू करतो आणि ते काम पूर्ण झाल्यानंतरच विश्रांती घेतो, थांबतो.

गेल्या साडे चार वर्षापासून केंद्र सरकार या कार्य पूर्तीसाठी निरंतर प्रयत्न करीत आहे. आणि इथं भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर तर योगीजींच्या नेतृत्वाखाली विकास कामांनी कमालीचा वेग घेतला आहे. राज्यातली त्यांच्या संपूर्ण टीमने वेगाने विकास कामांचा धडाकाच लावला आहे.

मित्रांनो, विकासाची पंचधारा महत्वाची आहे. पंचधारा म्हणजेच मुलांना शिक्षण, युवकांना रोजगाराचे साधन, जेष्ठ, वयोवृद्धांना औषधोपचार, शेतकरी बांधवांना सिंचनाची सुविधा, आणि जनतेचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी भाजपाची सरकारे काम करीत आहेत. हेच लक्ष्य समोर ठेवून पुढची वाटचाल आम्ही करीत आहोत. अगदी आत्ताच  आपण बुंदेलखंड आणि उत्तर प्रदेशच्या विकासासाठी जवळपास 20 हजार कोटी रूपयांच्या कामांचा शिलान्यास केला काही प्रकल्पांचे लोकार्पण केले आहे. यामध्ये संरक्षण, रोजगार, रेल्वे, विज पुरवठा, पाणी योजना अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे.

बंधू आणि भगिनींनो, आता बुंदेलखंड  हा भाग देशाची सुरक्षा आणि विकासाचा एक कॉरिडॉर बनवण्याची मोहीम आम्ही सुरू केली आहे. झांशीपासून ते आगरापर्यंत बनवण्यात येणार ‘डिफेन्स कॉरिडॉर’ देशात अधिकाधिक सशक्त करणार आहे, त्याचबरोबर बुंदेलखंड आणि उत्तर प्रदेशातल्या युवकांना रोजगाराच्या अनेक नवीन संधी उपलब्ध करून देणार आहे. देश आणि जगभरातले मोठ मोठ्या गुंतवणूकदारांनी या भागात उद्योग सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे.

आत्तापर्यंत जवळपास चार हजार कोटी रूपयांचे सामंजस्य करार झाले आहेत, अशी माहिती मला देण्यात आली आहे. या ‘डिफेन्स कॉरिडॉर’ मध्ये संरक्षण आणि सुरक्षा सामुग्री निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी देशातल्या मोठ्या सरकारी कंपन्यांच्याबरोबरच परदेशी कंपन्याही आपला उद्योग सुरू करणार आहेत.

बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळी मोठे उद्योग सुरू होतात त्यावेळी त्या परिसरामधल्या लहान-लहान उद्योगांचाही विकास होत असतो. एक प्रकारची उद्योग साखळी तयार होत असते. उद्योग- व्यवसायाचे एक वातावरण तयार होते. झांशी आणि आजूबाजूच्या भागातल्या लहान आणि मध्यम उद्योगांना या कॉरिडॉरचा खूप मोठा लाभ होवू शकणार आहे. या कॉरिडॉरमुळे इथल्या लाखो लोकांना थेट रोजगार मिळणार आहे. इतकंच नाही तर इथल्या नवयुवकांच्या कौशल्य विकसनाची जबाबदारीही इथं येणा-या कंपन्या घेणार आहेत. यामुळे इथला युवक एखाद्या कामाचे कौशल्य शिकून घेईल आणि आपल्याच गावामध्ये रोजी-रोटी कमावू शकणार आहे. त्याला रोजगारासाठी परमुलुखामध्ये जावे लागणार नाही.

मी गुजरातचा रहिवासी होतो. आमच्या गुजरातमध्ये सगळीकडे बुंदेलखंडामधला कोणी ना कोणी वास्तव्य करीत होतेच. त्यामुळेच तुम्हा लोकांशी माझा चांगला परिचय आहे. बुंदेलखंडसारखे क्षेत्र औद्योगिक विकासाचे केंद्र बनू शकते, याचा कोणी आत्तापर्यंत विचारसुद्धा केला नसेल. याबाबतीत मी आपला अनुभव सांगू इच्छितो. गुजरातमध्ये, पाकिस्तानी सीमेवर वाळवंटी प्रदेशात आमचा कच्छ हा जिल्हा आहे.  आकारानं हा जिल्हा मोठा आहे. एकही अधिकारी या जिल्ह्यामध्ये नोकरी करायला जायला तयार नसतो आणि लोकही तिथं रहायला तयार नव्हते. लोकसंख्या वृद्धीचा आलेख खालच्या दिशेने जात होता, म्हणजेच कच्छची लोकसंख्या वाढण्याऐवजी ती दिवसेंदिवस कमी होत होती. या मागचे कारण म्हणजे तिथं पाणी नव्हतं आणि रोजगार मिळवून रोजी-रोटी कमवावी यासाठी तिथं कोणतीही साधनं नव्हती.

परंतु 2001च्या भूकंपानंतर माझ्यावर राज्याचा मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. कच्छ जिल्हा म्हणजे फक्त रणरणते वाळवंट असाच परिचय या भागाचा होता. या जिल्ह्यासाठी आत्तापर्यंत कोणी पाण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली नव्हती. एवढंच नाही तर, कच्छमधल्या युवकांशी आपल्या कन्येचा विवाह करून देण्यासही कोणी तयार नसायचे. मात्र तुम्ही आज कच्छ जिल्हा पहाल तर लक्षात येईल की, हिंदुस्तानमध्ये सर्वात वेगाने प्रगती करणारा, सर्व क्षेत्रात आघाडी घेणारा जिल्हा कोणता आहे, याची माहिती घेतली तर कच्छचं नाव घेतलं जात आहे. कच्छ विकसित होत असताना मी स्वतः पाहिला आहे. माझ्या डोळ्यादेखत कच्छचं संपूर्ण रूप पालटलं आहे. नजिकच्या भविष्यात कच्छप्रमाणेच बुंदेलखंडही असाच वेगाने बदलणार आहे. माझ्या डोळ्यासमोर विकसित बुंदेलखंडचे चित्र आत्ता येत आहे.

वाळवंटी कच्छ पूर्णपणे बदलू शकतो तर मग बुंदेलखंडही नक्कीच बदलू शकतो, याचा मला विश्वास आहे. आणि म्हणूनच आत्तापर्यंत जे लोक निराशावादी विचार करत होते,  आपल्या प्रदेशाच्या विकासासाठी काही करावे, असा विचारही करत नव्हते, अशा लोकांना या भूमीवरून बाहेर पाठवण्याचा संकल्प करून एक मोठे, भव्यदिव्य परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार आम्ही केला आहे. या संकल्पाच्या पूर्तीसाठी ‘डिफेन्स कॉरिडॉर’ पूर्ण करण्याच्या मागे आम्ही लागलो आहोत. या भागाच्या विकासासाठी आम्ही काम करीत आहोत.

मित्रांनो, आज या इथे आणखी एका आव्हानाविषयी आपल्याशी बोलणार आहे. हे आव्हान आहे ते -पाण्याचे! पाणी या भागाची सर्वात मोठी समस्या आहे. पाण्याचे आव्हान कठीण आहे. तुम्हा सर्वांना पाण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो, याची मला पुरेपूर कल्पना आहे. तुमची पाणी समस्या कायमची सोडवण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करीत आहोत. यासाठी आज 9 हजार कोटी रूपये खर्चाच्या जलवाहिनीच्या कामाचा शिलान्यास करण्यात येत आहे.

या जलवाहिनीचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, आणि आम्हाला तुमच्या घरामध्ये पेयजल पोहोचते करता यावे, यासाठी बुंदेलखंडच्या सर्व माता, भगिनींनी आम्हाला अगदी मनापासून, भरभरून आशीर्वाद द्यावेत. पाण्याच्या समस्येचा सर्वात जास्त त्रास होतो, तो आपल्या माता-भगिनींना. आज मी आपले हे कर्ज चुकते करण्यासाठी आलो आहे. पेयजलाचे संकट तुमच्या जीवनातून कायमचे हद्दपार करण्यासाठी मी आज इथे आलो आहे. आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावेत, म्हणजे जलवाहिनीच्या माध्यमातून पाणी तुमच्या घरामध्ये लवकरात लवकर पोचेल. मी तर म्हणतो की, ही जलवाहिनी म्हणजे काही फक्त पाण्याची वाहिनी टाकण्याचा प्रकल्प नाही, ही या क्षेत्राची केवळ जलवाहिनी नाही तर हा प्रकल्प म्हणजे इथल्या जनतेची जीवन वाहिनी आहे.

बंधू आणि भगिनींनो, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बुंदेलखंडातल्या प्रत्येक जिल्ह्याला म्हणजे झांशी, ललितपूर, जालौन, हमीरपूर, महोबा, बांदा आणि चित्रकूट मधल्या जवळपास सर्व गावांना पेयजल जलवाहिनीच्या माध्यमातून देणे शक्य होणार आहे. याचप्रमाणे झांशी शहर आणि आजूबाजूच्या गावांसाठी अमृत योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारने 600 कोटी रूपये खर्चाची एक योजना तयार केली आहे. बेतवा नदीच्या पाण्याने झांशी शहरातल्या लोकांची तहान तर भागणार आहेच, त्याचबरोबर आजूबाजूच्या अनेक गावांनाही बेतवा नदीचे पाणी मिळू शकणार आहे.

बंधू आणि भगिनींनो, हे सर्व प्रकल्पांमुळे पाण्याची सध्याची गरज तर भागणार आहेच. त्याचबरोबर भविष्यकाळात वाढणारी पाण्याची मागणी लक्षात घेवून तितक्या जास्त क्षमतेच्या प्रकल्पाची आम्ही आखणी केली आहे.

बंधू आणि भगिनींनो, पर्वतीय बांध प्रकल्पाच्या आधुनिकीकरणामुळेही शेतकरी बांधवांना खूप चांगला लाभ होणार आहे. याआधी या बांधामधून शेतकरी वर्गाच्या शेतापर्यंत पुरेशा प्रमाणात पाणी पोहोचत नव्हते आणि बांधाचे दरवाज बंद केल्यानंतर पाण्याची गळती होत रहायची. आता पाण्याची गळती बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर या अर्थसंकल्पामध्ये भाजपा सरकारने ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ या नावाने एक ऐतिहासिक योजना आणली आहे. या योजनेनुसार ज्या शेतकरी बांधवांकडे पाच एकरापेक्षा कमी शेतजमीन आहे, त्यांच्या बँक खात्यामध्ये दरवर्षी सहा हजार रूपये केंद्र सरकारच्यावतीने थेट जमा करण्यात येणार आहेत. हा निधी दोन दोन हजाराच्या तीन हप्त्यामध्ये आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. सरकारच्या अंदाजानुसार उत्तर प्रदेशातल्या दोन कोटी 25 लाख शेतकरी बांधवांपैकी 2 कोटी 14 लाख शेतकरी बांधवांना या नवीन योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. याचाच अर्थ जवळपास सगळ्यांना म्हणजेच उत्तर प्रदेशातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या 95 टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांना या योजनेचा फायदा होणार आहे.

मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत आगामी दहा वर्षामध्ये सगळे मिळून साडे सात लाख कोटी रूपये, हा आकडा, ही रक्कम काही लहान नाही. साडे सात लाख कोटी रूपये शेतकरी बांधवांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. सरकारकडून पैसे थेट बँक खात्यामध्ये जाणार आहेत. यामध्ये कोणीही दलाल, मध्यस्थ असणार नाही. आपल्या जे हक्काचे पैसे आहेत, ते कोणी घेवू शकणार नाहीत. हे तुम्ही सर्वांनी कायमचे लक्षात ठेवा.

मित्रांनो, गेल्या साडे चार वर्षांमध्ये गरीबांचे, शेतकरी बांधवांचे  अतिशय मोठ्या संख्येने आणि वेगाने बँकांमध्ये खाती उघडली जात आहेत. यामागेही आम्ही खूप दूरवरचा विचार होता. याआधी कोणीही उठून बँकेत जावून खाती उघडण्याचे कष्ट घेत नव्हते. तुम्हा सर्वांना बँकेत खाते उघडायला लावण्यामागे एक चांगला विचारही होता. आता तुम्हाला मिळणारे गॅसचे अनुदान, मनरेगाच्या मजुरीचे पैसे, निवृत्ती वेतन, मुलांना मिळणारी शिष्यवृत्ती, असे वेगवेगळे दिले जाणारे पैसे सरकारी खजिन्यातून इकडे-तिकडे कुठेही न जाता, थेट आपल्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजेत. या पैशांना कुठेही गळती लागू नये, यासाठी हे सर्व केले आहे. आता पैशांना लागणारी गळती बंद झाली आहे. तुम्हाला आणखी एक माहिती सांगतो, आपल्या खात्यांमध्ये थेट पैसे जमा होत असल्यामुळे देशाचे जवळपास एक लाख कोटी रूपये वाचले आहेत. याआधी हेच एक लाख रूपये कोणाच्या तरी खिशात जात होते. तुम्हा सर्वांना जे कोणी लूटत होते, त्या मध्यस्थांच्या, दलालांच्या समोर आज मोदी एक भिंत बनून उभा राहिला आहे.

बंधू आणि भगिनींनो, शेतकरी बांधवांबरोबर आमच्या सरकारने पशुपालक आणि मासेमारी करीत असलेल्या बांधवांसाठीही एक खूप चांगला, महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बुंदेलखंडामध्ये पशुपालकांसाठी ही महत्वाची गोष्ट आहे. आता पशुपालकांनाही किसान क्रेडिट कार्डाव्दारे कर्जाची सुविधा देण्यात येणार आहे. असे कर्ज घेवून पशुपालकांना आपला व्यवसाय आणखी वाढवता येणार आहे. सध्या पशुपालकांना सावकारांकडून कर्ज घ्यावे लागते. सावकारांचे व्याज देतानाच त्यांचं संपूर्ण आयुष्य जातं. आता सावकारी कर्जाच्या चक्रातून पशुपालकांची आणि मच्छिमार बांधवांची मुक्तता करण्याचा संकल्प आम्ही केला आहे.

शेतकरी बांधवांच्या हितासाठी आणखी एक अतिशय महत्वाचा निर्णय आम्ही घेतला आहे. याआधी शेतकरी वर्गाला बँकांकडून एक लाख रूपयांपर्यंतचे कृषी कर्ज कोणत्याही तारण, हमीशिवाय मिळत होते. आता काळाची गरज लक्षात घेवून शेतकरीही आधुनिक पद्धतीने शेती करायला लागले आहेत. वैज्ञानिक पद्धतीने शेती करत आहेत. अशा वेळी त्यांच्या हातामध्ये खर्चाला पैसे रहावेत, यासाठी विनातारण कर्जाच्या रकमेत वाढ करून आता ती एक लाख साठ हजार रूपये केली आहे. विनातारण कर्जामध्ये वृद्धी करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. याचाच अर्थ आता शेतकरी बंधू एक लाख साठ हजार रूपयांपर्यंतचे कर्ज  कोणत्याही बँक हमीशिवाय घेवू शकतो. आता शेतकरी बांधवाला सावकाराकडे जाण्याची आवश्यकता नाही.

याचप्रमाणे पशुधनाचा विचार करून सरकारने कामधेनू आयोग स्थापण्याचा आणि या आयोगाच्या सल्ल्यानुसार कार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. गोमाता आणि गोवंशाच्या देखभालीसाठी 500 कोटीं रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासंदर्भात आवश्यक नियम, कायदे यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. बुंदेलखंडमध्ये जनावरांच्या चा-याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे त्याचप्रमाणे गोवंश तस्करी हाही गंभीर विषय आहे. या समस्या लक्षात घेवून कामधेनू आयोग निर्माण करून एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

मित्रांनो, या आव्हानांबरोबरच या भागामध्ये असलेली विजेची समस्या दूर करण्यासाठी वितरण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता बुंदेलखंडासह पश्चिमी उत्तर प्रदेशातल्या बहुतांश भागामध्ये विद्युत पुरवठ्यात सुधारणा होईल. आता पश्चिम आणि उत्तर ग्रिडमध्ये उत्पादित होणा-या विजेचे वितरण अगदी चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करणे शक्य होईल.

मित्रांनो, बुंदेलखंड एक्सप्रेस-वे असेल अथवा इथून असलेले रेल मार्गाची संपर्क व्यवस्था असेल; आमच्या सरकारने दळणवळण सुलभ व्हावे, यावर सातत्याने भर दिला आहे. झांशी ते माणिकपूर आणि खैरार ते भीमसेन सेक्शन यांच्या दुपदरीकरणाचे काम असो अथवा झांशी ते खैरार आणि खैरार ते भीमसेन या मार्गाचे विद्युतिकरणाचे काम असो, या सर्व प्रकल्पांमुळे या संपूर्ण क्षेत्राला खूप मोठा लाभ मिळणार आहे.

बंधू आणि भगिनींनो, शेतकरी बंधू असो, जवान असो अथवा नवयुवक- नवयुवती असो, सगळ्यांसाठी एक संपूर्ण- समग्र विचाराने विकासाचा मंत्र जपत ‘सबका साथ – सबका विकास’ असे म्हणतात, आम्ही कोणत्याही प्रकारचा भेदभाव करीत नाही. कोणी एक माझा नाही की तुमचा नाही. कोणी आपला नाही की कोणी परका नाही. ‘सबका साथ – सबका विकास’ हा एकच मंत्र घेवून आम्ही काम केले आहे. आपण लोकांनी साडेचार वर्षांपूर्वी केंद्रामध्ये एक मजबूत सरकार आणलं होतं, म्हणूनच अशी प्रचंड विकास कामे या काळात आम्ही करू शकलो. मी संपूर्ण उत्तर प्रदेशाचा आभारी आहे. हिंदुस्तानमध्ये 30 वर्षांनी पूर्ण बहुमत मिळवून सरकार सत्तेवर आले. गेल्या 30 वर्षांमध्ये हिंदुस्तानात पहिल्यांदा एक स्थिर सरकार आले. हिंदुस्तानला 30 वर्षांनी मजबूत सरकार देणे, हिंदुस्तानला 30 वर्षांनी निर्णय घेणारे सरकार देणे, यामध्ये सर्वात मोठी आणि महत्वाची भूमिका निभावली आहे ती माझ्या या उत्तर प्रदेशाने! माझ्या उत्तर प्रदेशातल्या मतदारांनी हे महत्वाचे कार्य केले आहे. या उत्तर प्रदेशातल्या मतदारांच्या निर्णय शक्तीमुळे भारताचे भाग्य बदलले. भारताच्या भाग्याची दिशा बदलली. 30 वर्षांपासून निराशेच्या गर्तेमध्ये बुडून गेलेल्या देशाला आशेचा नवीन किरण दाखवण्याचं काम 2014 मध्ये या उत्तर प्रदेशच्या जनतेने केले आहे. मजबूत सरकार याचा अर्थ नेमका काय असतो? मजबूत सरकारचा जनता जनार्दनाला नेमका फायदा काय होतो?  मजबूत सरकारमुळे संपूर्ण जगभरामध्ये देशाचा गौरव कसा काय केला जातो? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे या उत्तर प्रदेश राज्यानं दिली आहेत. त्याचा लाभ संपूर्ण हिंदुस्तानला मिळाला आहे.

देशाच्या विकासासाठी आणि नवभारताच्या निर्माणासाठी आपण सर्वजण आगामी दिवसांतही मला असेच आणखी मजबूत बनवणार आहात, असा मला पूर्ण विश्वास आहे.

बंधू आणि भगिनींनो, विकास योजना आणि रोजगाराच्या संधी देणा-या सर्व प्रकल्पांसाठी मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा खूप-खूप शुभेच्छा देतो.  मी उमाजी यांचेही विशेष अभिनंदन करतो. अगदी लहान -सहान गोष्टींचा विचार करून या क्षेत्राच्या विकासासाठी ज्या उद्देशाने सरकारमधल्या अनेक विभागांना त्या अगदी हलवून टाकत असतात, सर्व विभागांना कामाला लावत असतात, या क्षेत्राचे काम व्हावे म्हणून धावाधाव करीत असतात. मंत्री म्हणून पूर्ण देशाची जबाबदारी असतानाही या भागाचे संसद सदस्य म्हणून त्या ज्याप्रकारे जबाबदारी पार पाडतात, त्याबद्दल मी उमाजी यांचे हृदयापासून खूप – खूप अभिनंदन करतो. तसेच त्यांना खूप – खूप धन्यवाद देतो.

संपूर्ण शक्तीनिशी माझ्याबरोबर म्हणा –

भारत माता की – जय !

भारत माता की – जय !

भारत माता की – जय !

खूप -खूप धन्यवाद !!

 

B.Gokhale/S.Bedekar /P.Kor