Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

किर्गिझस्तान मध्ये बिश्केक येथे झालेल्या 26 व्या एससीओ शिखर परिषदेत पंतप्रधानांचा सहभाग (01 सप्टेंबर 2026)

किर्गिझस्तान मध्ये बिश्केक येथे झालेल्या 26 व्या एससीओ शिखर परिषदेत पंतप्रधानांचा सहभाग (01 सप्टेंबर 2026)


नवी दिल्‍ली, 1 सप्‍टेंबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिझस्तान मध्ये बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 01 सप्टेंबर 2026 दरम्यान आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) राष्ट्र प्रमुखांच्या 26 व्या बैठकीत सहभागी झाले.

या वर्षी एससीओचा 25 वा वर्धापनदिन आहे. या निमित्ताने, नेत्यांनी आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि या प्रदेशातील शांतता, सुरक्षा, स्थैर्य आणि समृद्धीसाठी एससीओची भूमिका अधिक बळकट करण्याबाबत विचार-विनिमय केला.

पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना किर्गिझस्तानचे राष्ट्राध्यक्ष महामहिम सादिर झापारोव्ह यांनी केलेल्या स्नेहमय आदरातिथ्याबद्दल त्यांचे आभार मानले. त्यांनी नमूद केले की, एससीओने विकसित केलेल्या संवाद आणि सहकार्याच्या मजबूत परंपरेचा आधार घेऊन पुढील 25 वर्षांसाठीचा कृती आराखडा तयार करण्यासाठी या शिखर परिषदेचा 25 वा वर्धापनदिन ही एक योग्य वेळ आहे. त्यांनी नमूद केले की, मागील शिखर परिषदेत भारताने सुरक्षा, कनेक्टिव्हिटी आणि संधी या विषयांवर आपला दृष्टीकोन मांडला होता आणि आता संयुक्त कार्याच्या या तिन्ही स्तंभांमध्ये ठोस परिणाम साध्य करण्यासाठी या गटाने काम केले पाहिजे. संघर्ष युद्धभूमीवर सोडवता येत नाहीत, त्यासाठी  संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच एकमेव मार्ग आहे, या भारताच्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला. दहशतवाद हा मानवतेसाठी गंभीर धोका असल्याचे अधोरेखित करत, दहशतवादाची संपूर्ण परिसंस्था नष्ट करण्यासाठी वचनबद्ध कृतीचे त्यांनी आवाहन केले.

दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात कोणत्याही प्रकारची दुहेरी मानके  नसावीत, यावर त्यांनी विशेष भर दिला. युरेशिया क्षेत्रातील सुरक्षा ही अफगाणिस्तानमधील शांतता आणि स्थिरतेशी घट्टपणे जोडलेली आहे, असे नमूद करून,  त्यांनी त्या देशाला भारताकडून दिल्या जाणाऱ्या विकासविषयक आणि मानवतावादी मदतीवर प्रकाश टाकला.

समूहाच्या सामायिक प्रगती आणि समृद्धीसाठी मजबूत आणि विश्वासार्ह संपर्क व्यवस्था उपक्रम महत्त्वाचे आहेत, असेही पंतप्रधानांनी सांगितले. बाजारपेठांना जोडणाऱ्या, व्यापाराला चालना देणाऱ्या आणि विकासाच्या नवीन संधी निर्माण करणाऱ्या संपर्कविषयक प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याचे अधोरेखित केले. तसेच अशा प्रयत्नांनी राष्ट्रांचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. तंत्रज्ञान, उद्योजकता, नवोन्मेषी कल्पना, स्टार्ट-अप्स आणि ‘जन-ते-जन’ (people-to-people) संपर्क उपक्रम हे ‘एससीओ’ देशांमधील लोकांसाठी प्रचंड संधी निर्माण करतात, असेही त्यांनी सविस्तरपणे सांगितले. या संदर्भात, किर्गिस्तानच्या अध्यक्षतेखाली तरुणांच्या सहभागावर देण्यात आलेला भर लक्षात घेवून, पंतप्रधान मोदी यांनी त्याचे कौतुक केले. या वर्षाच्या उत्तरार्धात ‘एससीओ सिव्हिलायझेशन डायलॉग फोरम’ची पहिली आवृत्ती आयोजित करण्यास भारत उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. सदस्य देशांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्याच्या उद्देशाने सुरू केलेला हा भारताचा एक प्रमुख उपक्रम आहे.

‘बिश्केक जाहीरनाम्या’व्यतिरिक्त, या शिखर परिषदेत हवामान, अणुसुरक्षा, ऊर्जा संवर्धन आणि अंमली पदार्थांच्या व्यसनाशी लढा यांसारख्या क्षेत्रांमध्ये चार सामंजस्य करार  करण्‍यात आले. तसेच वीसहून अधिक निर्णय आणि निवेदने स्वीकारण्यात आली.

भारताने अनेक उपक्रमांचे नेतृत्व केले आणि त्यांना पाठिंबा दिला. त्यांचा  समावेश ‘बिश्केक जाहीरनाम्या’मध्ये करण्यात आला आहे. यामध्ये एससीओ  सनदेमध्ये इंग्रजीचा अधिकृत भाषा म्हणून समावेश, ‘सिव्हिलायझेशन डायलॉग फोरम’ म्हणजेच संस्‍कृती संवाद मंच, यंग सायंटिस्ट फोरम (युवा शास्त्रज्ञ मंच) आणि यंग ऑथर्स कॉन्क्लेव्ह (युवा लेखक परिषद) यांचा समावेश आहे.

शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष महामहीम सादिर झापारोव्ह यांचे आभार मानले. सामायिक प्रगती आणि समृद्धीसाठी एससीओ परिवारासोबत काम करण्याबाबत भारताची कटिबद्धता त्यांनी व्यक्त केली.

 

* * *

सुषमा काणे/राजश्री आगाशे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai