पीएम्इंडिया

सर्व वरीष्ठ मान्यवर आणि भारताचे नाव जगात उज्ज्वल करणाऱ्या माझ्या खेळाडू मित्रांनो, १० वर्षांपूर्वी हा कांकरिया भाग कसा होता हे या भागाशी परिचित असणाऱ्या अनेकांना निश्चितच आठवत असेल. या डेरीचे भग्नावशेष, भटक्या कुत्र्यांचा मोकाट वावर अशी दुरवस्था होती. स्वप्न पाहण्याचे सामर्थ्य असले तर जग कसे बदलता येते, हे आपल्याला येथे निश्चितच पाहायला मिळेल. क्रीडा विश्वातील जे मान्यवर येथे आले आहेत, त्यांनी या संपूर्ण क्रीडागारातील सर्व सुविधा पाहाव्यात आणि त्या पाहिल्यानंतर, आमचे खेळाडू परदेशात ज्या सोयी-सुविधा पाहतात, त्या भारतातही विकसित होत आहेत, हे सांगून इतरांना प्रेरित करावे, अशी मी विनंती करतो.
मला जेव्हा आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या खेळाडूंना भेटण्याची संधी मिळते, तेव्हा मी आवर्जून त्यांच्याशी संवाद साधतो, त्यांचे अनुभव जाणून घेतो. मला आपल्या खेळाडूंचे मनोधैर्य कायम उंचावलेले असल्याचेच दिसून आले आहे. ते कठोर मेहनत करतात. खडतर परिस्थितीतही जगात भारताचा ध्वज फडकावण्यासाठीचा त्यांचा निर्धार नेहमी पक्का असतो. आपल्याकडे सामर्थ्यशाली युवा पिढी आहे, संपूर्ण भारत माझ्यासमोर आहे, पण आपल्या देशातील अनेक लोकांची मानसिकता अजून पुरेशी परिपक्व नाही. आपले खेळाडू प्रवास करतात. रेल्वे, विमानातून फिरतात, लोकांच्या ओळखी होतात, मग विचारले जाते की तुम्ही काय करता? काही सांगतात, राष्ट्रीय पातळीवर खेळतो, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळतो. यावर पुढचा प्रश्न काय असतो, सांगू का? पुढचा प्रश्न असतो, वा वा, तुम्ही राष्ट्रीय पातळीवर खेळता, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळता, पण करता काय? म्हणजे खेळणे ही सुद्धा देशसेवा आहे, यात सुद्धा कारकीर्द घडवता येते, हे अनेकांना मान्यच होत नाही. अनेकांना हा अनुभव येत असेल. राष्ट्रीय पातळीवर खेळतो, असे सांगितल्यानंतरही, खेळता, ते चांगलं आहे, पण करता काय, असा प्रश्न विचारला जातो. सीमेवर जो जवान उभा असतो, त्याला जर कोणी विचारले की तुम्ही काय करता? तर तो उत्तर देईल की मी सीमेवर उभा असतो. त्यावर जर त्याला कोणी असे म्हणत असेल की ते ठीक आहे, पण काम काय करता, तर त्याच्या मनाला किती यातना होतील? आजच्या आपल्या समाजात माझ्या खेळाडूंना हेच ऐकावे लागते. केवळ समाजातच नाही तर अनेकांच्या घरातूनच सुरूवात होते. खेळतच राहणार आहेस की अभ्यासाकडे लक्ष देशील?सकाळ झाली की घराबाहेर पडता.. काही लोक तर पुलेला गोपीचंद यांनाही म्हणत असतील की तुम्ही आमच्या मुलांना बिघडवता…
आपल्या देशात ही परिस्थिती आहे आणि मला ही परिस्थीती बदलायची आहे. खेळामुळे त्या व्यक्तीला आयुष्यात यशाची नवनवी शिखरे गाठण्याची संधी मिळते, त्याचबरोबर या खेळाडूंमुळे, त्यांच्या उत्तम खेळामुळे सव्वाशे कोटी भारतीयांना जगासमोर मान उंचावण्याची संधी मिळते. जगात कोणत्याही देशात मी भाषण करताना, तेथील खेळाडूचे नाव घेतले की उपस्थित सर्व ५-५ मिनीटे टाळ्यांचा कडकडाट करतात.
अलीकडेच दोन दिवसांपूर्वी मी पोर्तुगालमध्ये होतो, तेथील फुटबॉलपटूंचा मी उल्लेख केला आणि सगळे वातावरण बदलून गेले. टाळ्यांचा कडकडाट होऊ लागला. आपल्या देशातही खेळाडूंबद्दल अशी सन्मानाची, आदराची परंपरा असली पाहिजे. आपल्या देशात ही सामाजिक भावना रूजली पाहिजे. त्यासाठी यंत्रणाही विकसित झाल्या पाहिजेत. आज मला क्रीडा क्षेत्रातील महाकुंभ म्हणता येईल, अशा कार्यक्रमाच्या सादरीकरणाच्या ॲपचे लोकार्पण करण्याची संधी मिळाली. प्रत्येक जण राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू झालाच पाहिजे, असा आग्रह नाही. पण खेळण्यामुळे आयुष्य फार आनंदी होते. खेळ जगायला शिकवतो. खेळाडूंच्या आयुष्यातून आपण एक महत्वाची गोष्ट शिकू शकतो. अनेकदा लोक म्हणतात की, आम्हा राजकारण्यांना यश पचवणे शिकले पाहिजे. पण मी अनेक खेळाडूंना पराभव स्वीकारताना पाहिले आहे, खेळाडूंमध्ये हे सामर्थ्य असते आणि हे सामर्थ्यच त्यांना विजयपथावर घेऊन जातो. हे सामर्थ्य खेळातून मिळते, खेळाच्या मैदानावर मिळते. प्रत्येक क्षण हा विजय-पराभवाचा असतो आणि प्रत्यक्ष आयुष्यातही विजय-पराभवाचा स्वीकार करण्याची सवय असणे ही फार सुदैवाची बाब असते. खेळाडूंना अशा प्रकारे आयुष्य जगण्याची संधी मिळते. अशा प्रकारची व्यवस्था विकसित करण्याची आवश्यकता आहे.
खेळाच्या या महाकुंभात गेल्या वेळी ३० लाख लोक गुजरातमध्ये खेळाच्या मैदानात उतरले होते. प्रत्येक जण खेळात कुशल असेलच, अशी अपेक्षा करणे योग्य नाही. खेळ सुरू असताना तुम्ही टाळ्या वाजवल्या तरी खेळणाऱ्याचा उत्साह वाढतो. जिंकायची लालसा वाढते. खेळ ही स्वाभाविक संस्कृती झाली पाहिजे. म्हणूनच खेळाचा हा महाकुंभ सुरू केला आहे. आज इतक्या कमी वेळात गुजरातमध्ये हे शक्य झाले आहे.
गुजरातमध्ये मुले शाळा-महाविद्यालयात शिकायला जातात, तेव्हा खिशात दोन पेन घेऊन जातात आणि संध्याकाळी घरी येताना त्यातील एक पेन विकून येतात. त्यांच्या रक्तातच व्यापार असतो. आमचे लोक एखादी नवी वस्तू घेऊन निघाले की ती मित्रमंडळींना दाखवणार आणि ती विकून येणार, हे नक्की. अशा या गुजरातमध्ये प्रतिभावंत खेळाडूंचीही कमतरता नाही. राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धांमध्ये हे खेळाडू चमकदार कामगिरी करतात, यापेक्षा मोठा आनंद काय असेल? २५ वर्षांत गुजरातला १० सुवर्ण पदके मिळाली, २५ वर्षांत १०… आणि क्रीडा महाकुंभाचा असा परिणाम झाला की गुजरातला एका वर्षात १० सुवर्ण पदके मिळाली.
आता प्रत्येक शहरात, प्रत्येक जिल्ह्यात खेळण्यासाठी मैदाने तयार करणे, प्रशिक्षण देणे, चांगले खेळाडू घडविणे, शाळेत क्रीडा संस्कृती रूजवणे हे घडत जाणार आहे. ज्याप्रमाणे आम्ही गुजरातमध्ये क्रीडा महाकुंभ केला, त्याचप्रमाणे आता देशभरात ‘खेले इंडिया’ अभियान राबवणार आहोत. कोट्यवधी लोक यात सहभागी होतील. खेळामुळेच आयुष्यात आनंद बहरतो. आज मी जेव्हा हे स्टेडीयम पाहिले तेव्हा मला मनापासून आनंद झाला. अगदी सुरूवातीपासून मी याची जडण-घडण पाहत होतो, त्यामुळे इथल्या बदलत्या चित्राचा मी साक्षीदार आहे. पूर्णपणे तयार झालेले हे स्टेडियम पाहिल्यानंतर मला मनापासून आनंद झाला आणि असे वाटले की शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी या स्टेडियमची सफर घडविणारा अर्ध्या तासाचा कार्यक्रम तयार केला पाहिजे. गुजरात सरकारनेही विद्यार्थ्यांना हे स्टेडीयम दाखविले पाहिजे. जेव्हा विद्यार्थी येथे फिरतील, तेव्हा त्यांना यामागील विज्ञानाची जाणीव होईल, खेळात किती ताकत असते, त्याची जाणीव होईल. खेळात आधुनिक तंत्रज्ञान किती खोलवर रूजलेले असते याची जाणीव होईल. क्रीडा जगतातल्या लोकांच्या आहारावर किती नियंत्रण ठेवावे लागते, हे समजेल. मला चांगलेच आठवते, आमच्या मित्राचा मुलगा, पार्थिव पटेल, त्याला आम्ही लहानपणापासून ओळखतो. तो चांगला खेळाडू व्हावा, यासाठी त्याचे काका सकाळी चार वाजता त्याला स्कूटरवर बसवून खेळाच्या मैदानात पोहोचत. हा त्यांचा रोजचा दिनक्रम होता. संपूर्ण आयुष्यभर सकाळी चार वाजता उठणे,थंडी असो, पाऊस असो कशाचीही तमा न बाळगता त्याच्या दिनक्रमात खंड पडू न देणे, या अशा तपश्चर्येतून एखादा पार्थिव पटेल घडतो. त्यासाठी संपूर्ण कुटुंबाची साथ असावी लागते.
तुम्ही सर्वांनी एकदा तरी दीपाची भेट घ्यावी, असा आग्रह मी करेन. एक खेळाडू म्हणून संपूर्ण देश दीपाला ओळखतो, पण आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल की दीपा ही उत्तम प्रोत्साहन देणारी मुलगी आहे. कधीतरी तिचे अनुभव तुम्ही ऐका.. अर्धे शरीर हालचाल करू शकत नाही, पण ती नेहमी नव्या स्वप्नांबद्दल बोलते, नव्या उत्साहाने भरभरून बोलते. नव्या उमेदीने आपला चरितार्थ चालविण्याबद्दल बोलते. ही अशी माणसे आमच्या युवा पीढीचे आदर्श आहेत. असे आदर्श सोबत घेऊन देशात खेळासाठी पोषक वातावरण निर्माण करायचे आहे, देशातील युवा पिढीला प्रेरीत करायचे आहे. त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करायची गरज आहे. पहिल्यांदाच देशात खाजगी-सार्वजनिक भागिदारीतून क्रीडा जगतासाठी गुजरातने एक नवे मॉडेल दिले आहे. सरकार आणि उद्योग विश्व, व्यापार विश्व एकत्र येऊन आपल्या नव्या पीढीसाठी काय घडवू शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
येत्या काही दिवसात ऑलिम्पीकच्या मैदानातही भारताची उत्तम कामगिरी दिसून येईल, असा विश्वास मला वाटतो. ही कामगिरी अधिक व्यापक होईल, याची मला खात्री वाटते. जगातील अगदी लहान लहान देशही ऑलिम्पीकमध्ये उत्तम कामगिरी करतात आणि संपूर्ण जगात आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करतात. सव्वाशे कोटींचा भारतसुद्धा असे स्वप्नं पूर्ण करू शकतो, आपल्या देशात हे सामर्थ्य आहे. युवकांना संधी हवी, युवकांना व्यवस्था हवी आणि युवकांना कुटुंबाकडून संपूर्ण सहकार्य हवे आहे. हेच युवक आपल्या देशात बदल घडविण्याचे सामर्थ्य बाळगून आहेत आणि म्हणूनच आम्ही अशी व्यवस्था तयार करतो आहोत.
मी सुद्धा देशात ज्या ज्या ठिकाणी खेळाडूंची भेट घेईन, तेव्हा त्यांना आग्रह करेन की या ठिकाणी या आणि ही व्यवस्था पाहा. यात आणखी काय सुधारणा करायला हव्यात, ते सांगा. हळू-हळू देशात अशा प्रकारची व्यवस्था विकसित करू या. मित्रांनो, आज व्हीडीयो गेममध्ये आपल्या अनेक पिढ्या वाया जात आहेत. मला खेळाच्या मैदानात मुलांना पाहायचे आहे. मी जेव्हा गुजरातमध्ये होतो, तेव्हा अनेकदा शाळांमध्ये जात असे. सतत दोन-तीन दिवस जात असे आणि मुलांना प्रश्न विचारत असे, दिवसातून किती वेळा घाम गाळता, किती वेळ धावता, झाडावर किती वेळा चढता, किती भरभर जीने चढू शकता..? अनेकदा मला दु:ख होते. अनेक मुले मला विचारतात, घाम म्हणजे काय असते? शाळेतून आम्ही थेट घरी जातो, नंतर घराबाहेर पडत नाही.
असे बाल्य आपल्याला उज्ज्वल भवितव्य देऊ शकणार नाही. आपल्या कुटुंबातील मुलांना खेळाची गोडी लावणे, हे आपले कौटुंबिक कर्तव्य आहे. कोणत्याही साधनांशिवाय खेळणेही शक्य आहे. आपला संघ उत्तम क्रिकेट खेळतो, ही खरोखरच अभिमानाची बाब आहे. पण त्याचवेळी आपण फुटबॉल आणि हॉकीला विसरणे योग्य नाही. माझे सहकारी भूतिया या ठिकाणी बसले आहेत. फुटबॉल या खेळात त्यांनी खऱ्या अर्थाने देशाचे नाव उंचावले आहे. या वर्षी भारतात एकोणीस वर्षाखालील फिफा विश्वचषक भारतात होत आहे. जगभरातील खेळाडूंना मी आपल्या देशात आणतो आहे. यांचा खेळ पाहून माझ्या देशातील युवकांमध्येही खेळाची प्रेरणा निर्माण व्हावी, असे मला वाटते. जगभरातील खेळाडू येथे आले पाहिजेत. आपण यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. क्रिकेट व्यतिरिक्तही असे अनेक खेळ आहेत, ज्यांत भारत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करू शकतो. नेमबाजी, तिरंदाजी अशा अनेक क्षेत्रात भारताचे खेळाडू आज उत्तम कामगिरी करत आहेत. खेळाच्या या क्षेत्रात आमच्या मुली मुलांना अगदी सहज मागे टाकताना आपण पाहत आहोत. आमच्या मुली आमच्या देशाचे नाव उज्ज्वल करीत आहेत. आमच्या देशाच्या या लेकी एकापेक्षा एक सरस कामगिरी करत आहेत. जर माझ्या देशातील मुलींमध्ये हे सामर्थ्य असेल, तर त्यापेक्षा कोणती प्रेरणा जास्त प्रभावी ठरेल?
मित्रांनो, देशभरात खेळाला आयुष्याचे अविभाज्य अंग व्हावे, यासाठी प्रयत्न करू या. व्यवस्था विकसित करू या. उद्योग जगताने पुढाकार घ्यावा, कुटुंबांनी पुढाकार घ्यावा,सरकारांनी पुढाकार घ्यावा,समाजाने पुढाकार घ्यावा आणि भारताने क्रीडा विश्वातही आपले नाव उज्ज्वल करावे.
याच सदिच्छेसह आपणा सर्वांना माझ्या अनेकानेक शुभेच्छा.
हा असा कार्यक्रम आहे, जेथे नवा भारत माझ्यासमोर बसला आहे. येथून जाण्याची इच्छा होऊ नये, असे वातावरण आहे. मात्र येथून गेल्यानंतर रात्री १२ वाजता संसदेत भारताच्या सौभाग्याच्या एका नव्या दिशेचे द्वार खुले होणार आहे. मला येथून थेट संसदेत पोहोचायचे आहे. पण तरीसुद्धा, शक्य तितका वेळ आपणा सर्वांसोबत घालवण्याची संधी मला मिळाली. हे खेळाडू येथे आहे, त्याबद्दल त्यांचा मन:पूर्वक आभारी आहे. आमच्या शब्दांपेक्षा तुम्ही गाळलेल्या घामात जास्त ताकत आहे. आपल्या मेहनतीची ताकत फार मोठी आहे. या मित्रांनो, पुढे या. या सर्वांनी आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. अगदी अलिकडेच आपण श्रीकांतचे नाव ऐकले असेलच. श्रीकांत, जरा हात वर करा पाहू. श्रीकांतने अलिकडेच आपल्या उत्तम खेळाने देशाची मान उंचावली आहे.
बंधु आणि भगिनिंनो, ही आपल्या देशाची खरी संपत्ती आहे. आपण सर्व उभे राहून, टाळ्यांच्या गजरात यांना सन्मानित करू. अनेकानेक आभार!!!
B.Gokhale/M.Pange/Anagha
A state of the art stadium, #TheArena by @SETransStadia is being inaugurated by the Prime Minister in Ahmedabad. pic.twitter.com/JVeNF0i7un
— PMO India (@PMOIndia) June 30, 2017
Record enthusiasm as the Prime Minister begins his speech at the inauguration of #TheArena by @SETransStadia. pic.twitter.com/45XKYdtBTC
— PMO India (@PMOIndia) June 30, 2017
Those familiar with the area in which this stadium is will tell you how different it looked a decade ago & how it changed for the better: PM
— PMO India (@PMOIndia) June 30, 2017
The determination of our sportspersons is admirable. They have pursued their passion with great diligence: PM @narendramodi pic.twitter.com/fVyphX7x5f
— PMO India (@PMOIndia) June 30, 2017
We must adopt a culture where sports is appreciated and supported, starting from the family: PM @narendramodi pic.twitter.com/nxBXIqBvXx
— PMO India (@PMOIndia) June 30, 2017
Khel Mahakumbh has brought a strong shift and further encouraged a sporting culture in Gujarat: PM @narendramodi at launch of #TheArena pic.twitter.com/s2YYuEqUzi
— PMO India (@PMOIndia) June 30, 2017
Our youth must meet @DeepaAthlete if they get the opportunity to. She is a good sportsperson and am equally good motivator: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 30, 2017
This stadium shows how the government and private sector can work together in creating good sporting infrastructure: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 30, 2017