Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुरुनानक देव जी यांची शिकवण आणि मूल्ये आत्मसात करावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन


गुरु नानक देव जी यांची मूल्ये आणि शिकवण आजही आपल्याला मार्गदर्शक असून सर्वांनी ती आत्मसात करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान आज कर्तारपूर कॉरिडॉर एकात्मिक चेक पोस्ट च्या उदघाटन समारंभात डेरा नानक देव जी येथे बोलत होते. यावेळी गुरु नानक देव जी यांच्या 550 व्या जनशताब्दीनिमित्त एका विशेष नाण्याचेही त्यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

उपस्थित एका मोठ्या जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, डेरा बाबा नानक या पवित्र स्थळी कर्तारपूर कॉरिडोर राष्ट्राला समर्पित करताना सन्मानित झाल्याची भावना जाणवत आहे.

तत्पूर्वी शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक समितीने पंतप्रधानांना कौमी सेवा पुरस्कार देऊन गौरवले. पंतप्रधान म्हणाले की ते हा पुरस्कार श्री गुरु नानक देव जी यांच्या कमलचरणी समर्पित करत आहेत .

पंतप्रधान म्हणाले की, 550 व्या गुरु नानक जयंती निमित्त आयसीपी आणि कर्तारपूर कॉरिडोरचे उद्घाटन एक शुभ आशीर्वाद आहे , यामुळे आता पाकिस्तानातील गुरुद्वारा दरबार साहिबला भेट देणे सहज शक्य होणार आहे.

पंतप्रधानांनी एसजीपीसी, पंजाब सरकार आणि हा कॉरिडॉर विक्रमी वेळेत पूर्ण करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. यामुळे सीमेपलिकडच्या यात्रेकरूंना प्रवास करणे सुलभ होणार आहे. पंतप्रधानांनी पाकीस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचेही आभार मानले.

गुरुनानक देव जी हे केवळ भारतासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी प्रेरणा आहेत असं पंतप्रधान म्हणाले. गुरुनानक देव जी हे केवळ देव नव्हते तर तत्वज्ञानी आणि आपल्या जीवनासाठी मदतीचा स्तंभ आहेत , असं मोदी म्हणाले. गुरुनानक देव जी यांनी आपल्याला त्यांच्या मूल्यातून जीवनाचे महत्व शिकवले, प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वासावर आधारित आर्थिक व्यवस्था दिली, असं मोदी म्हणाले.

गुरु नानक देव जी यांनी समाजात समानता, बंधुभाव आणि एकतेची शिकवण दिली असं पंतप्रधान म्हणाले. कर्तारपूर हा नानक देव जी यांच्या दिव्यत्वाने भारलेले पवित्र स्थळ असून ह्या कॉरिडॉरमुळे हजारो भाविकांना मदत होणार आहे.

गेल्या पाच वर्षात देशाचा गौरवशाली वारसा आणि संस्कृतीचे रक्षण करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. गुरु नानक देवजी यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त देशात तसेच परदेशात आपल्या दूतावासांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत असे ते म्हणाले.

देशात गुरु गोबिंद सिंग यांची 350 वी जयंती साजरी करण्यात आल्याची आठवण त्यांनी करून दिली. गुरु गोबिंद सिंग यांच्या सन्मानार्थ जामनगरमध्ये 750 खाटांचे आधुनिक रुग्णालय बांधण्यात आल्याचा त्यांनी उल्लेख केला.

तरुण पिढीला लाभ व्हावा यासाठी युनेस्कोच्या सहकार्याने गुरुवाणीचे विविध जागतिक भाषांमध्ये भाषांतर केले जात आहे असे पंतप्रधान म्हणाले. सुलतानपूर लोधी वारसा शहर म्हणून विकसित करण्यात येत असून गुरु नानकजी यांच्याशी संबंधित महत्वाच्या स्थानांना जोडण्यासाठी विशेष रेल्वेगाडी सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. श्री अकाल तख्त , दम दमा साहिब, तेजपूर साहिब, केशगड साहिब, पाटणा साहिब आणि हुजूर साहिब यांना रेल्वे आणि हवाई मार्गे जोडण्यासाठी संपर्क व्यवस्था मजबूत केली जात आहे असे ते म्हणाले. अमृतसर आणि नांदेड दरम्यान विशेष विमानसेवा देखील सुरु झाली आहे. तसेच अमृतसर-लंडन दरम्यान एअर इंडियाच्या विमानात एक ओंकार संदेश ऐकवला जात आहे.

जगभरातील अनेक शीख कुटुंबांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने आणखी एक प्रमुख निर्णय घेतल्याचे पंतप्रधान म्हणाले. परदेशात राहणाऱ्यांना भारतात येण्यासाठी गेली काही वर्षे ज्या अडचणींचा सामना करावा लागत होता त्या आता दूर करण्यात आल्या आहेत. अनेक कुटुंबाना व्हिसा आणि ओसीआय कार्डांसाठीं अर्ज करता येईल. ते आता भारतातील नातेवाईकांना सहज भेटू शकतील तसेच तीर्थस्थळांना भेटी देऊ शकतील.

केंद्र सरकारचे आणखी दोन निर्णय शीख समुदायासाठी सहाय्यक ठरल्याचे ते म्हणाले. पहिला निर्णय कलम 370 रद्द करणे. या निर्णयाचा जम्मू आणि काश्मीर आणि लेहमध्ये राहणाऱ्या शीख समुदायाला लाभ होईल, त्यांनाही देशाच्या अन्य नागरिकांप्रमाणे समान अधिकार मिळतील. तसेच नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे देशाचे नागरिक बनणे सहज शक्य होणार आहे.

गुरु नानक देवजी यांच्यापासून गुरु गोबिंद जी पर्यत अनेक धार्मिक गुरूंनी देशाची एकता आणि सुरक्षेसाठी आपले जीवन समर्पित केले. अनेक शीख बांधवांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली. हे सर्व लोकांपर्यंत आणण्यासाठी केंद्र सरकारने अनेक पावले उचलली आहेत. जालियनवाला बाग स्मारकाचे आधुनिकीकरण केले जात असल्याचा उल्लेख त्यांनी केला. शीख विद्यार्थ्यांचे कौशल्य सुधारणे आणि स्वयं -रोजगारावर भर दिला जात आहे. यासंदर्भात, त्यांनी सुमारे 27 लाख शीख बांधवांना शिष्यवृत्ती दिल्याचे सांगितले.

S.Thakur/S.Kane/P.Kor