Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि पर्यावरण संवर्धनासाठी उत्कटतेने कार्य करणाऱ्या सर्वांचे कौतुक केले.

हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला पुढे नेण्याप्रती आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करण्याची संधी आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. गेल्या दशकात सरकारच्या विविध उपक्रमांमुळे हरित आच्छादनात वाढ झाली असून काही प्राण्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

भारतातील जनतेचे सामूहिक प्रयत्न, प्रभावी धोरणे, विज्ञानावरील विश्वास आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून पर्यावरणात लक्षणीय सुधारणा घडवून आणता येते हे सिद्ध करून दाखवले आहे, असे मोदी म्हणाले.

भारताला आपल्या जैवविविधतेचा अत्यंत अभिमान आहे, जैवविविधतेचा भाग असलेल्या परिसंस्थांच्या वैविध्यामुळे असंख्य प्रजाती आणि लोकांच्या उपजीविकेला आधार मिळतो, असे पंतप्रधान म्हणाले.

काही महत्त्वाच्या प्रजातींचे संरक्षण आणि संवर्धनातील प्रगतीचा उल्लेख करताना मोदी यांनी सांगितले की माळढोक (ग्रेट इंडियन बस्टर्ड), हिमबिबट्या (स्नो लेपर्ड), अस्वल (स्लॉथ बेअर) आणि चित्ता यांच्या संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख त्यांनी केला. वचनबद्धतेच्या बळावर वन्यजीव आणि परिसंस्था पुनर्स्थापित करण्यास कशी मदत होऊ शकते याची हे प्रयत्न झलक असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

‘एक पेड माँ के नाम’ सारख्या उपक्रमांचे दरवर्षी सुमारे 1.1 लाख हेक्टर वन क्षेत्र वाढविण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. 

‘एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य’ या तत्त्वाने प्रेरित होऊन भारत, मिशन लाईफमार्फत अधिक स्वच्छ, हरित आणि शाश्वत ग्रहाच्या निर्मितीसाठी कार्य करीत राहील, असे प्रतिपादन मोदी यांनी केले.

भारतीय ज्ञानपरंपरेत सांस्कृतिक मूल्यव्यवस्था सुरेख प्रतिबिंबित झाली आहे, असे सांगून पंतप्रधानांनी पर्यावरणाच्या जतन आणि संवर्धनाचा संदेश अधिक बळकट करण्यासाठी त्यांनी एक पवित्र संस्कृत सुभाषित आपल्या संदेशात दिले.

आपल्या एक्स  वरील संदेशांच्या मालिकेत पंतप्रधानांनी म्हटले आहे,

“जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वांना उत्तमोत्तम शुभेच्छा. पर्यावरण संवर्धनासाठी उत्कटतेने कार्य करणाऱ्या सर्वांचे मी मनःपूर्वक कौतुक करतो. हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याप्रती आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करण्याचा आहे. गेल्या दशकात आमच्या सरकारने केलेल्या अनेक प्रयत्नांमधून या दिशेने केलेले कार्य ठळकपणे दिसून येते. भारताच्या महत्त्वपूर्ण यशामध्ये हरित आच्छादनाचा विस्तार आणि काही प्राण्यांच्या संख्येत झालेली वाढ यांचा समावेश आहे. भारतातील जनतेचे सामूहिक प्रयत्न, धोरणे, विज्ञानावरील विश्वास आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून पर्यावरणात कशी सुधारणा घडवून आणता येते हे दाखवून दिले आहे.”

“भारताला आपल्या जैवविविधतेचा अभिमान आहे. आपल्या विविध परिसंस्था असंख्य प्रजातींना आणि लोकांच्या उपजीविकेला आधार देतात. काही खास प्रजातींच्या पुनर्स्थापनेसाठी केलेले आपले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. माळढोक (ग्रेट इंडियन बस्टर्ड), हिमबिबट्या (स्नो लेपर्ड), अस्वल (स्लॉथ बेअर) आणि चित्ता यांच्या संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्न सातत्यपूर्ण आहेत. त्यांतून वन्यजीव आणि परिसंस्थांचे पुनरुज्जीवन कसे शक्य होते याची झलक मिळाली आहे. ‘एक पेड माँ के नाम’ यांसारख्या उपक्रमांचे दरवर्षी सुमारे 1.19 लाख हेक्टर वन क्षेत्र वाढविण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे.”

“‘एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य’ या तत्त्वाला धरून, मिशन लाईफच्या माध्यमातून आम्ही अधिक स्वच्छ, हरित आणि शाश्वत ग्रहाच्या निर्मितीसाठी सातत्याने कार्यरत असू.”

“निसर्ग संरक्षण ही केवळ जबाबदारी नाही; तर आमची संस्कृती आणि संस्कारांचा अविभाज्य भाग आहे.

मधु वाता ऋतायते मधु क्षरन्ति सिन्धवः। माध्वीर्नः सन्त्वोषधीः॥”

“वारा आमच्याभोवती सुखद आणि हितकारक वाहत राहो; नद्या जीवनदायी व पोषक जल प्रदान करोत; आणि लहान वनस्पती तसेच झाडे सर्व सजीवांच्या आरोग्य व कल्याणासाठी उपकारक ठरोत.”

***

NehaKulkarni / ReshamaBedekar / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai