Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात”द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (24 फेब्रुवारी 2019)


माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार !

आज ‘मन की बात’ सुरू करताना मन अगदी भरून आलं आहे. भारत-मातेनं दहा दिवसांपूर्वी आपल्या वीर सुपुत्रांना गमावलंय. या पराक्रमी वीरांनी सव्वाशे कोटी भारतीयांच्या रक्षणासाठी स्वतःचे प्राण दिले. देशवासीय शांतपणानं झोपू शकावेत, यासाठी आमचे हे शूर-वीर पुत्र रात्रंदिवस एक करून प्राणाची बाजी लावत होते. पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये वीर सैनिकांच्या हौतात्म्यानंतर देशभरामधल्या लोकांच्या मनावर आघात झाला आहे तसंच मनामध्ये संतापाची तीव्र भावना निर्माण झाली आहे. शहीद झालेले वीर जवान आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी चोहोबाजूनं सहवेदना व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारच्या दहशतवादी हिंसेच्या विरोधामध्ये तीव्र संतापाच्या भावना आपल्या सर्वांच्या आणि माझ्या मनामध्ये आहेत, त्याच भावना प्रत्येक देशवासियाच्या मनात आणि मानवतेवर विश्वास ठेवणा-या संपूर्ण विश्वातल्या मानवतावादी समुदायांच्या मनामध्ये दडलेल्या आहेत. भारत-मातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणा-या देशाच्या सर्व वीर सुपुत्रांना, मी वंदन करतो. दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी या वीरांचे हौतात्म्य निरंतर प्रेरणा देत राहील. दहशतवादाची पाळंमुळं खणून काढण्याचा आमचा संकल्प, निर्धार आता अधिक मजबूत होईल. आपण सर्वांनी जातीवाद, संप्रदायवाद, क्षेत्रवाद आणि इतर सर्व मतभेदांना विसरून आज देशापुढे उभे ठाकलेल्या या आव्हानाला तोंड दिलं पाहिजे. दहशतवादाच्या विरोधात आता आपण जी पावले उचलणार आहोत, ती पूर्वीपेक्षाही अधिक दृढ, सशक्त आणि निर्णायक पावले असली पाहिजेत. आपल्या सशस्त्र दलाने नेहमीच अद्वितीय साहस आणि पराक्रम दाखवला आहे. जिथे शांती प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी अदभूत क्षमता दाखवली आहे. तिथेच हल्लेखोरांना त्यांच्याच भाषेत सडेतोड प्रत्युत्तर देण्याचं काम त्यांनी केलं आहे. शंभर तासांच्या आतच कशा प्रकारे कारवाई करण्यात आली, हे आपण सर्वांनी पाहिलं असेलच. सेनेनं दहशतवादी आणि त्यांना मदत करणा-यांचा समूळ नाश करण्याचा संकल्प, निर्धार केला आहे. वीर सैनिकांच्या हौतात्म्यानंतर त्यांच्या कुटुंबियांकडून जे प्रेरणादायी विचार व्यक्त केले जात आहेत ते सर्व प्रसार माध्यमांतून सगळ्यांपर्यंत पोहोचत आहेत. यामुळे देशातल्या जनतेच्या हिंमतीला बळ मिळत आहे.

बिहारमधल्या भागलपूरचे शहीद रतन ठाकूर यांचे पिता रामनिरंजनजी यांनी अशा दुःखद प्रसंगातही जी हिंमत दाखवली, ती आपल्या सर्वांना प्रेरणा देणारी आहे. शत्रूशी लढण्यासाठी आपला दुसरा मुलगाही आपण सैन्यात पाठवू आणि गरज पडली तर आपण स्वतः लढू, असं त्यांनी म्हटलं आहे. ओडिशातल्या जगतसिंहपूरचे शहीद प्रसन्ना साहू यांच्या पत्नी मीनाजी यांच्या अदम्य साहसाला संपूर्ण देश सलाम करत आहे. त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलालाही ‘सीआरपीएफ’मध्येच भर्ती करण्याचा निर्धार केला आहे. झारखंडमध्ये गुमला या गावी ज्यावेळी तिरंग्यामध्ये लपेटलेले शहीद विजय शोरेन यांचे पार्थिव पोचले, त्यावेळी त्यांच्या निष्पाप मुलाने आपणही लष्करातच भर्ती होणार असल्याचं सांगितलं. या निरागस बालकानं दाखवलेली हिंमत म्हणजे आज भारतवर्षातल्या प्रत्येक लहान-लहान बालकाचीच भावना आहे. अशीच भावना आपल्या वीर, पराक्रमी शहीदांच्या घरा- घरांमधून व्यक्त होताना दिसत आहे. आमचा एकही वीर हुतात्मा याला अपवाद नाही की त्यांचे कुटुंबीय अपवाद नाही. मग ते देवरियाचे हुतात्मा विजय मौर्य यांचे कुटुंबीय असो अथवा कांगडाचे शहीद तिलकराज यांचे माता-पिता असो किंवा कोटाचे शहीद हेमराज यांचा सहा वर्षांचा मुलगा असो. हुतात्मा जवानांच्या प्रत्येक परिवाराची कथा, प्रेरणा देणारी आहे. या कुटुंबियांनी मोठं धैर्य दाखवून ही देशप्रेमाची भावना व्यक्त केली आहे, ती आजच्या युवापिढीनं समजून- जाणून घ्यावी , असं माझं आवाहन आहे. देशभक्ती कशी असते? त्याग- तपस्या म्हणजे काय? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला इतिहासातल्या जुन्या घटनांकडे पाहण्याची आवश्यकता भासणार नाही. आपल्या डोळ्यासमोरच ही चालती-बोलती उदाहरणं आहेत. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी हीच उदाहरणं प्रेरणा स्त्रोत आहेत.

माझ्या प्रिय देशवासियांनो, गेली अनेक वर्षे राष्ट्रीय सैनिक स्मारकाची आपण वाट पहात होतो, आता ही वाट पाहणं लवकरच संपणार आहे. स्वातंत्र्यानंतर इतक्या प्रदीर्घ कालखंडामध्ये हे काम होऊ शकलं नाही. त्यामुळे देशवासियांच्या मनामध्ये त्याविषयी जिज्ञासा, उत्सुकता असणं स्वाभाविक आहे. ‘नरेंद्रमोदीअॅप’वर कर्नाटकातल्या उडुपीचे रहिवासी श्रीयुत ओंकार शेट्टी यांनी ‘नॅशनल वॉर मेमोरियल’ म्हणजेच राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे काम पूर्ण होऊन ते तयार करण्यात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. भारतामध्ये एकही राष्ट्रीय युद्ध स्मारक नाही. सैनिक स्मारक नाही, याचं मला आश्चर्यही वाटत होतं आणि मनाला यातनाही होत होत्या. राष्ट्राच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणा-या वीर जवानांच्या महान शौर्याची गाथा जतन करून ठेवणारं स्थान म्हणजे असे हे स्मारक असते. देशामध्ये असं प्रेरणादायी स्मारक असावं असा विचार करून ते बनवण्याचा मी निश्चय केला.

राष्ट्रीय सैनिक स्मारक उभारण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि प्रत्यक्ष कामाला प्रारंभही करण्यात आला. विशेष म्हणजे हे स्मारक अतिशय कमी वेळेमध्ये तयारही झालं आहे, याचा मला आनंद आहे. उद्या, म्हणजेच 25 फेब्रुवारीला हे राष्ट्रीय सैनिक स्मारक, आम्ही कोट्यवधी देशवासी आमच्या लष्कराकडे सुपूर्द करणार आहोत. आपल्यावर असलेलं ऋण चुकतं करण्याचा हा अगदी अल्पसा प्रयत्न देश करणार आहे.

दिल्लीचे हृदयस्थान ज्या जागेला म्हटलं जातं, त्या इंडिया गेट आणि अमर जवान ज्योत भागाजवळच हे नवीन स्मारक बनवण्यात आलं आहे.

या राष्ट्रीय सैनिक स्मारकाला भेट देणं म्हणजे एखाद्या तीर्थस्थानी भेट देण्याइतकंच पवित्र कार्य देशवासियांच्या दृष्टीनं असणार आहे, असा मला विश्वास आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वोच्च बलिदान देणा-या सैनिकांबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक म्हणजे हे राष्ट्रीय सैनिक स्मारक आहे. या स्मारकाची रचना आमच्या अमर सैनिकांच्या अदम्य साहसाचं प्रदर्शन करणारी आहे. या राष्ट्रीय सैनिक स्मारकाची संकल्पना चार केंद्रीत चक्रांवर आधारित आहे. यामध्ये एका सैनिकाच्या जन्मापासून ते हौतात्म्यापर्यंतचं चित्रण आहे. अमर चक्राची ज्योत शहीद सैनिकाच्या अमरतेचं प्रतीक आहे. दुसरं चक्र वीरतेचं आहे. यामध्ये सैनिकांनी दाखवलेलं साहस, शौर्य यांचं प्रदर्शन आहे. या भागामध्ये एका दीर्घेमध्ये भिंतीवर सैनिकांच्या शौर्याच्या गाथा कोरण्यात आल्या आहेत. यामध्ये देशासाठी सर्वोच्च बलिदान देणा-या सैनिकांची नावं सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिण्यात आली आहेत. यानंतर असलेलं रक्षक चक्र सुरक्षेचं प्रतिबिंब करत आहे. या चक्रामध्ये घनदाट झाडांच्या रांगा आहेत. ही झाडं म्हणजे सैनिकांचे प्रतीक आहेत आणि देशाच्या नागरिकांना विश्वास देणारा एक संदेशही देत आहेत.प्रत्येक घडीला सैनिक सीमेवर तैनात आहे आणि देशवासी सुरक्षित आहेत,असा हा संदेश आहे. एकूण पाहिलं, तर हे राष्ट्रीय सैनिक स्मारक म्हणजे एक आगळं स्थान बनणार आहे. या स्थानी देशाच्या महान शहीदांची माहिती मिळू शकणार आहे. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता येणार आहे. या वीर सैनिकांच्या शौर्याची माहिती घेण्याच्या उद्देशाने कोणी इथं येतील. त्यावेळी त्यांना देश सुरक्षित रहावा, आपण जीवंत रहावे, देशाचा विकास करावा, म्हणून आपले प्राण देशासाठी अर्पण करणा-या जवानांची माहिती मिळू शकणार आहे. देशाच्या विकासामध्ये आमचे सशस्त्र दल, पोलीस आणि अर्धसैनिक दल यांचं महान आणि अमूल्य योगदान शब्दांमध्ये व्यक्त करणं खरोखरीच शक्य नाही. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये मला राष्ट्रीय पोलिस स्मारक देशाला समर्पित करण्याचं भाग्य लाभलं होतं. ते स्मारकही आपल्या विचारांचे प्रतिबिंब होते. आमच्या सुरक्षेसाठी निरंतर कार्यरत राहणारे पुरूष आणि महिला पोलिस कर्मचारी यांच्याविषयी आपण सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, असं मला वाटतं. आपण सर्वजण राष्ट्रीय सैनिक स्मारक आणि राष्ट्रीय पोलिस स्मारक यांना जरूर भेट द्याल, अशी आशा मला आहे. आपण यापैकी कुठंही जा, मात्र ज्यावेळी जाणार, त्यावेळी समाज माध्यमांच्याद्वारे आपली छायाचित्रे जरूर ‘शेअर’ करा. त्यामुळे इतर लोकांनाही या पवित्र स्थानाला आपणही भेट दिली पाहिजे, अशी प्रेरणा मिळेल आणि ते सुद्धा या पवित्र स्थळाला भेट देण्यासाठी उत्सुक होतील.

माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ साठी आपल्याकडून हजारों पत्र आणि प्रतिक्रिया येत असतात. वेगवेगळ्या माध्यमांमार्फतही याविषयी प्रतिक्रिया येत असतात. यावेळी जेव्हा मी आपल्याकडून आलेल्या प्रतिक्रिया वाचत होतो, त्यावेळी आतिश मुखोपाध्याय जी यांच्या अतिशय रंजक प्रतिक्रियेकडं माझं लक्ष वेधलं गेलं. त्यांनी लिहिलेलं आहे की, 3 मार्च 1900 रोजी इंग्रजांनी बिरसा मुंडा यांना अटक केली होती. त्यावेळी त्यांचं वय केवळ 25 वर्ष होतं. आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे दिनांक 3 मार्च रोजीच जमशेदजी टाटा यांची जयंतीही आहे. मुखोपाध्यायजी यांनी पुढं लिहिलं आहे की, ही दोन्ही व्यक्तिमत्वं संपूर्णपणे भिन्न आहेत. दोघेही अगदी वेगवेगळ्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून आलेले आहेत. मात्र या दोघांनीही झारखंडची परंपरा, तिथला वारसा आणि इतिहास समृद्ध केला आहे.

‘मन की बात’ मध्ये बिरसा मुंडा आणि जमशेदजी टाटा यांना श्रद्धांजली वाहणं म्हणजे एक प्रकारे झारखंडच्या गौरवशाली इतिहासाला आणि परंपरेला वंदन करण्यासारखं आहे. आतिश जी, मी आपल्या मताशी अगदी सहमत आहे. या दोन महान विभूतींनी झारखंडचंच नाही तर संपूर्ण देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे. संपूर्ण देश त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञ आहे. आज, आमच्या नवयुवकांना मार्गदर्शक म्हणून प्रेरणादायी व्यक्तित्व म्हणून कोणाचे नाव घेता येईल तर ते आहे भगवान ‘बिरसा मुंडा’ यांचं. इंग्रजांनी बिरसा मुंडा झोपलेले असताना अगदी लपून-छपून, अतिशय चतुराई दाखवून त्यांना पकडलं. मुंडा यांना पकडण्यासाठी असा पळपुटेपणाचा मार्ग इंग्रजांना का स्वीकारावा लागला, हे तुम्हाला माहिती आहे का? कारण इतकं मोठं साम्राज्य निर्माण करणारे इंग्रजी मुंडा यांना घाबरत होते. भगवान ‘बिरसा मुंडा यांनी केवळ आपल्या परंपरागत धनुष्यबाणाच्या मदतीने बंदुका आणि तोफांनी सज्ज असलेल्या इंग्रज सरकारला अगदी हलवून टाकलं होतं. वास्तविक, लोकांना असे एखादे प्रेरणादायी नेतृत्व मिळाले तर मग समोरच्या शत्रूकडे असलेल्या शस्त्रांस्त्रांच्या शक्तीपेक्षाही सामूहिक इच्छाशक्ती बलवान ठरते. भगवान ‘बिरसा मुंडा’ यांनी इंग्रजांबरोबर केवळ राजकीय स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला नाही, तर आदिवासींच्या सामाजिक आणि आर्थिक अधिकारांसाठीही लढा दिला. आपल्या अल्पायुष्यामध्ये त्यांनी सगळं काही करून दाखवलं. वंचित आणि शोषितांच्या अंधःकारमय जीवनामध्ये सूर्यकिरणांप्रमाणे प्रकाश आणला. भगवान बिरसा मुंडा यांनी वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी बलिदान दिले. बिरसा मुंडा यांच्यासारखे भारत मातेचे सुपूत्र देशाच्या प्रत्येक भागात झाले आहेत. अनेक दशकांपासून सुरू असलेल्या स्वातंत्र्याच्या या लढाईमध्ये कोणत्याही प्रकारचे योगदान दिले गेले नाही, असा या हिंदुस्तानचा एकही भाग, एकही तुकडा राहिलेला नाही. देशातल्या सर्व भागाचे, स्वातंत्र्यलढ्यात योगदान होते. परंतु दुर्भाग्य असे आहे की, या महान लोकांच्या त्यागाच्या, शौर्याच्या आणि बलिदानाच्या कथा नवीन पिढीपर्यंत पोहोचल्याच नाहीत. जर भगवान ‘बिरसा मुंडा’ यांच्यासारख्या व्यक्तित्वाने आपल्याला अस्तित्वाची जाणीव करून दिली. तर जमशेदजी टाटा यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाने देशामध्ये मोठ-मोठ्या संस्था निर्माण केल्या. जमशेदजी टाटा अगदी ख-या अर्थाने ‘द्रष्टा’ होते. त्यांनी केवळ भारताचे भविष्य कसे असावे, याचा विचार केला नाही तर देशाची मजबूत पायाभरणी केली. उज्ज्वल भविष्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योग यांचे भारत हे केंद्रस्थान बनणं आवश्यक आहे, हे जमशेदजी टाटा यांना चांगलं ठाऊक होतं. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच ’टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ची स्थापना करण्यात आली. याच संस्थेला आता ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ’ म्हणजेच भारतीय विज्ञान संस्था म्हणून ओळखलं जात आहे. इतकंच नाही तर त्यांनी टाटा स्टीलसारख्या अनेक विश्वस्तरीय संस्था आणि उद्योगांची स्थापना केली. जमशेदजी टाटा आणि स्वामी विवेकानंद जी यांची एकदा अमेरिकेच्या प्रवासाच्या काळात जहाजामध्ये भेट झाली होती. त्यावेळी या दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. या प्रवासात भारतामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासारख्या महत्वपूर्ण विषयावर या दोघांमध्ये चर्चा झाली होती. या चर्चेतूनच भारतीय विज्ञान संस्थेची पायाभरणी झाली.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या देशाचे माजी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांचा जन्म 29 फेब्रुवारी रोजी झाला होता. आपल्या सर्वांना माहीत आहेच ही तारीख चार वर्षांनी एकदाच येते. साधे, शांत व्यक्तित्वाचे असणारे मोरारजीभाई, देशातल्या सर्वात शिस्तबद्ध नेत्यांपैकी एक होते. स्वतंत्र भारतामध्ये संसदेमध्ये सर्वात अधिकवेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रमही मोरारजीभाई देसाई यांच्या नावावर आहे. ज्यावेळी देशाची लोकशाही संकटामध्ये आली होती, त्या कठीण काळामध्ये मोरारजी देसाईंनी भारताचे कुशल नेतृत्व केलं. त्यामुळे आपल्या येणा-या पिढ्याही त्यांच्या आभारी असतील. मोरारजीभाई देसाई यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी आणीबाणीच्या विरोधात सुरू केलेल्या आंदोलनामध्ये स्वतःला झोकून दिलं होतं. त्याची त्यांना वृद्धापकाळामध्ये खूप मोठी किंमत मोजावी लागली होती. त्याकाळातल्या सरकारने त्यांना अटक करून तुरुंगामध्ये टाकलं होतं. 1977 मध्ये ज्यावेळी जनता पार्टीने निवडणुका जिंकल्या, त्यावेळी ते देशाचे पंतप्रधान बनले. त्यांच्या कार्यकाळामध्येच 44 वी घटना दुरूस्ती करण्यात आली. ही गोष्ट महत्वपूर्ण यासाठी आहे याचे कारण म्हणजे आणीबाणीच्या काळामध्ये 42 वी घटना दुरूस्ती करण्यात आली होती. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार कमी करणे आणि इतर अशाच काही तरतुदी होत्या. या तरतुदींमुळे आपल्या लोकशाही मूल्यांचे हनन केले जात होते. या सर्व तरतुदी रद्द करण्यात आल्या आणि लोकशाही मूल्यांचं जतन करण्यात आलं. 44 व्या घटना दुरूस्तीमध्ये संसद आणि विधानसभा यांच्यामध्ये होत असलेल्या कामकाजाची माहिती वर्तमान पत्रांमध्ये प्रकाशित करण्याची तरतूद करण्यात आली. याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाला काही विशेष अधिकार बहाल करण्यात आले. या घटना दुरूस्तीमध्ये आणखी एक विशेष तरतूद करण्यात आली. त्यानुसार घटनेच्या कलम 20 आणि 21 अनुसार मिळालेल्या मूलभूत अधिकारांचे आणीबाणीच्या काळातही हनन करण्यात येणार नाही, हे स्पष्ट झालं. तसंच मंत्रिमंडळाच्या लिखित विनंतीनंतरच राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा करू शकतील. त्याचबरोबर आणीबाणीचा कालावधी एका वेळेस सहा महिन्यांपेक्षा जास्त वाढवता येणार नाही, अशी व्यवस्था देशात घटनेनुसार पहिल्यांदा करण्यात आली. आणीबाणी लाऊन, 1975 मध्ये ज्याप्रकारे लोकशाहीची हत्या करण्यात आली होती, तशा गोष्टीची पुनरावृत्ती भविष्यात पुन्हा कधी घडू नये, यासाठी मोरारजी भाई यांनी ही घटना दुरूस्ती केली होती. भारतीय लोकशाहीचं महत्व, महात्म्य अबाधित राखण्यासाठी मोरारजीभाई देसाई यांनी दिलेलं योगदान अमूल्य आहे. येणा-या पिढ्या त्यांचं कायम स्मरण ठेवतील. आज पुन्हा एकदा या महान नेत्याला मी श्रद्धांजली अर्पण करतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो, दरवर्षीप्रमाणेच यंदाही पद्म पुरस्काराविषयी लोकांमध्ये खूप उत्सुकता होती. आज आपण एका नवभारताच्या निर्मितीच्या दिशेनं अग्रेसर आहोत. अशावेळी जे लोक अगदी तळागाळातल्या लोकांसाठी निस्वार्थी भावनेने कार्य करतात, त्यांचा आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला जावा, असं आपल्याला वाटतं. अनेकजण अतिशय परिश्रम घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणत आहेत. वास्तविक हे लोकच खरे कर्मयोगी आहेत. जे लोक जनसेवा, समाजसेवा आणि या सर्वांपेक्षा मोठ्या असलेल्या राष्ट्रसेवेमध्ये निःस्वार्थ भावनेने कार्यरत आहेत, ते कर्मयोगी आहेत. आपण सर्वांनी पाहिलंच असेल की, ज्यावेळी पद्म पुरस्काराची घोषणा होते, त्यावेळी कुणाला मिळाला? हे कोण आहे? असं लोक विचारतात,त्यावेळी मला वाटतं, या पुरस्काराचं हे खूप मोठं यश आहे. कारण हे लोक कधीच दूरचित्रवाणी, नियतकालिकं किंवा वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पानावर झळकत नाहीत. हे खरे कार्यकर्ते असून प्रसिद्धीच्या झगमगाटाच्या दुनियेपासून खूप दूर आहेत. आपलं नाव आलं किंवा आलं नाही, याची त्यांना पर्वा नसते. ते अगदी तळागळामध्ये कार्यरत आहेत. कामावर त्यांचा विश्वास आहे. ‘‘ योगः कर्मसु कौशलम्‘‘ गीतेचा हा संदेश ते एकप्रकारे प्रत्यक्ष जगत आहेत. अशाच काही लोकांविषयी मी आज आपल्याशी बोलू इच्छितो.

ओडिशाचे दैतारी नायक यांच्याविषयी आपण नक्कीच ऐकलं असेल. त्यांना ‘कॅनल मॅन ऑफ द ओडिशा’ असं काही उगाच म्हटलं जात नाही. दैतारी नायक यांनी आपल्या गावांमध्ये आपल्या हातांनी डोंगर फोडून कालव्यासाठी तीन किलोमीटरचा रस्ता तयार केला आहे. आपल्या अथक परिश्रमाने कृषी सिंचन आणि पेयजलाची समस्या कायमची संपुष्टात आणली. गुजरातचे अब्दुल गफूर खत्री यांचं कार्य जाणून घ्या. त्यांनी कच्छमधल्या पारंपरिक रोगन चित्रकारीतेला पुनर्जीवित करण्याचं अद्भूत कार्य केलं आहे. खत्री ही दुर्लभ चित्रकारिता नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत आहेत. अब्दुल गफूर यांनी बनवलेली ‘ट्री ऑफ लाईफ‘ ही कलाकृती मी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांना भेट म्हणून दिली होती. पद्म पुरस्कारांच्या मानक-यांमध्ये मराठवाड्याचे शब्बीर सैयद गोमातेचे सेवक म्हणून ओळखले जातात. त्यांनी ज्याप्रकारे आपलं संपूर्ण जीवन गोमातेच्या सेवेसाठी अर्पण केलं आहे, ते पाहून त्यांच्या कामाचं वेगळेपण दिसून येतं. मदुरै चिन्ना पिल्लई या व्यक्तिने तामिळनाडूमध्ये कलन्जियम आंदोलनाच्या माध्यमातून पीडितांना आणि शोषितांना सशक्त करण्याचं काम सर्वात प्रथम केलं. त्याचबरोबर समुदायांच्या माध्यमातून लघु वित्तीय व्यवस्थेला प्रारंभ केला. अमेरिकेच्या तावो पोर्चोन- लिंच यांच्याविषयी आपण ऐकलंत तर नक्कीच सुखद आश्चर्य वाटेल. लिंच आज ‘योगा’ची चालती-बोलती संस्था बनल्या आहेत. वयाचे शतक गाठलेले असतानाही त्या दुनियेतल्या अनेक लोकांना ‘योगा’चे प्रशिक्षण देत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी दीड हजार लोकांना ‘योगशिक्षक’ बनवलं आहे. झारखंडमध्ये लेडी टारझन या नावाने प्रसिद्ध असलेल्या जमुना टुडू यांनी टिम्बर माफिया आणि नक्षलवाद्यांशी दोन हात करण्याचं धाडसी काम केलं. इतकंच नाही तर 50 हेक्टर क्षेत्रातलं जंगल उजाड होण्यापासून वाचवलं. परिसरातल्या दहा हजार महिलांची एकजूट घडवून वृक्ष आणि वन्यजीवांची सुरक्षा करण्यासाठी सर्वांना प्रेरित करण्याचं काम या महिलेनं केलं. जमुनाबाईजी यांच्या परिश्रमामुळेच आता त्या भागातले गाववाले आपल्या घरातल्या प्रत्येक मुलाच्या जन्मानंतर 18 झाडं लावतात. आणि घरामध्ये मुलीचा विवाह असेल तर नवीन 10 झाडं लावतात.

गुजरातमधल्या मुक्ताबेन पंकजकुमार दगली यांची कथा तर आपल्या सर्वांना खूप प्रेरणा देणारी आहे. मुक्ताबेन स्वतः दिव्यांग आहेत. तरीही त्यांनी दिव्यांग महिलांच्या उत्थानासाठी केलेले कार्य पाहिले की, सर्वजण अचंबित होतात. त्यांच्या सारखं उदाहरण मिळणं कठीण आहे. चक्षू महिला सेवाकुंज नावाची संस्था मुक्ताबेन यांनी स्थापन केली आणि त्या माध्यमातून नेत्रहीन मुलांना स्वावलंबी बनवण्याचे पवित्र कार्य त्या करतात. बिहारमधल्या मुजफ्फरपूरच्या किसान चाची म्हणजे राजकुमारी देवी यांचे कार्यही असेच प्रेरणादायी आहे. महिला सशक्तीकरण आणि शेती कशा पद्धतीने लाभदायक ठरू शकेल, या दिशेने त्यांनी काम केले आहे. किसान चाचीने आपल्या भागातल्या 300 महिलांना स्वयंसहायता गटाशी जोडून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनण्यासाठी प्रेरित केलं आहे. त्यांनी गावातल्या महिलांना शेतीच्या बरोबरच रोजगाराच्या इतर साधनांचे प्रशिक्षण दिलं. विशेष गोष्ट ही आहे की, त्यांनी शेतीच्या कामाची सांगड तंत्रज्ञानाशी घातली आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, यावर्षी जे पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत, त्यामध्ये 12 शेतकऱ्यांना पद्म पुरस्कार मिळाले आहेत. विजेते आहेत. असे कदाचित पहिल्यांदाच झाले आहे. सर्वसाधारणपणे कृषी जगताशी संबंधित असलेल्या आणि प्रत्यक्ष शेती करणा-या फार कमी लोकांचा समावेश आत्तापर्यंत पद्म पुरस्कारांच्या यादीमध्ये झाला आहे. पुरस्कार विजेत्यांच्या सूचीमध्ये झालेले हे बदल म्हणजे एक प्रकारे परिवर्तन घडत असलेल्या हिंदुस्तानची नवीन प्रतिमा आहे, असं म्हणता येईल.

माझ्या प्रिय देशवासियांनो, एक हृदयाला अगदी भिडणारा अनुभव मला अलिकडेच आला तो आज आपल्याला इथं सांगणार आहे. आजकाल देशामध्ये मी जिथं जिथं जातो, तिथं माझा प्रयत्न असतो की, आयुष्मान भारत योजना ‘पीएम जेएवाय’ म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या काही लाभार्थींना भेटावं, त्यांच्याशी बोलण्याची संधी मला मिळावी, असा माझा प्रयत्न असतो. यामध्ये काही लोकांशी मी संवाद साधलाही. एका एकट्या मातेला पैशाअभावी स्वतःचे औषधोपचार करता येत नव्हते. तिला लहान मुलं होती. या नवीन योजनेमधून तिच्यावर औषधोपचार होऊ शकले, ती पूर्ण बरी झाली. एका घरातला कर्ता माणूस, रोजगार, परिश्रम करून आपल्या कुटुंबाची देखभाल करत होता; त्याच व्यक्तीलाच अपघात झाला यामुळे आता तो काम करू शकत नव्हता. या योजनेचा लाभ त्याला मिळाला, तो चांगला बराही झाला. आणि नव्याने आयुष्य जगू लागला.

बंधू आणि भगिनींनो, गेल्या पाच महिन्यांमध्ये जवळपास बारा लाख गरीब कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेमुळे गरीबांच्या जीवनात खूप मोठे परिवर्तन येत आहे, असं माझ्या लक्षात आलं आहे. जर एखाद्या गरीब व्यक्तीला पैशाअभावी औषधोपचार करणं शक्य नसेल, तर त्याला या योजनेची माहिती आपण सर्वांनी जरूर द्यावी. ही योजना अशाच गरीब व्यक्तींसाठी आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, शाळांमध्ये परीक्षांचा हंगाम आता सुरू होणार आहे. देशभरामध्ये वेगवेगळ्या परीक्षा मंडळांच्यावतीनं घेण्यात येणा-या दहावी आणि बारावीच्या परीक्षांना पुढच्या काही सप्ताहांमध्ये प्रारंभ होईल. परीक्षा देणा-या सर्व विद्यार्थ्यांनात्यांच्या पालकांना आणि सर्व शिक्षकांना माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा.

काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये ‘परीक्षा पे चर्चा’ अशा एका खूप मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. ‘टाऊन हॉल’कार्यक्रमाप्रमाणे त्याचं स्वरूप ठेवलं होतं. या टाऊन हॉल कार्यक्रमामध्ये तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देश-विदेशातले कोट्यवधी विद्यार्थी,त्यांचे पालक तसेच अनेक शिक्षक यांच्याबरोबर संवाद साधण्याची संधी मला मिळाली. ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे परीक्षेशी संबंधित असलेल्या विविध विषयांवर यावेळी अगदी मनमोकळा संवाद साधता आला. यामुळे विद्यार्थ्यांना निश्चित लाभदायक ठरतील, असे पैलू यावेळी चर्चेमध्ये आले. सर्व विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, माता-पिता यू-ट्यूबवर या कार्यक्रमाचे संपूर्ण रेकॉर्डिंग पाहू शकतात. आगामी परीक्षेसाठी माझ्या सर्व ‘परीक्षा योद्ध्यांना’ खूप खूप शुभेच्छा.

माझ्या प्रिय देशवासियांनो, भारताविषयी चर्चा सुरू आहे आणि सण-उत्सवाविषयी बोलणं होत नाही, असं होऊच शकत नाही. प्रत्येक दिवसाचं काही ना काही महत्व आपल्याकडे आहेच. काही विशेष नाही, किंवा सण नाही, असा दिवस आपल्या देशात कदाचित मिळणं अवघड जाईल. यामागचं कारण म्हणजे आपल्याला लाभलेली हजारो वर्षांची जुनी संस्कृती, परंपरा आहे. आता काही दिवसांतच महाशिवरात्र येणार आहे. यंदाच्या वर्षी तर महाशिवरात्र सोमवारी येत आहे. शिवाच्या वारी म्हणजे सोमवारी येणा-या महाशिवरात्रीचं विशेष महत्व आपल्याकडे सांगितलं जातं. महाशिवरात्रीच्याया पवित्र पर्वानिमित्त आपणा सर्वांना माझ्या खूप- खूप शुभेच्छा.

माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांपूर्वीच मी काशीला गेलो होतो. काशीच्या या भेटीमध्ये दिव्यांग बंधू-भगिनींबरोबर काही वेळ घालवण्याची संधी मिळाली. त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. त्यांचा आत्मविश्वास खरोखरीच प्रभावित करणारा होता. प्रेरणा देणारा होता. याच कार्यक्रमामध्ये त्यांच्यापैकी एका प्रज्ञाचक्षू नवयुवकाशी मी बोलत होतो. त्यावेळी त्यानं मला सांगितलं की, मी कलाकार आहे. मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये मिमिक्री म्हणजे नकला करतो. त्याला मी सहजच विचारलं, तू कुणाच्या नकला करतोस?यावर त्यानं उत्तर दिलं, ‘‘ मी पंतप्रधानांची अगदी तशीच नक्कल करतो.’’ मी म्हणालो, मग जरा करून दाखव बरं. आणि काय नवल, माझ्यासाठी त्याची नक्कल ऐकणं एक सुखद आश्चर्य होतं. त्या दिव्यांग युवकानं मी ‘मन की बात’ मध्ये ज्याप्रकारे बोलतो, अगदी त्याच पद्धतीनं नक्कल करीत बोलून दाखवलं. मला खूप छान वाटलं. याचा अर्थ लोक ‘मन की बात’ केवळ ऐकतात आणि सोडून देतात, असं नाही; तर या कार्यक्रमाचे अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने स्मरणही करतात. त्या दिव्यांग नवयुवकाच्या शक्तीने मी खरोखरीच खूप प्रभावित झालो.

माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी जोडले जाणे हा माझ्यासाठी एक आगळा-वेगळा अनुभव आहे. रेडिओच्या माध्यमातून मी एक प्रकारे कोट्यवधी कुटुंबांबरोबर दर महिन्याला संवाद साधतो. अनेकवेळा तर आपल्या सर्वांशी बोलताना, आपण पाठवलेली पत्रं वाचताना किंवा आपण दूरध्वनीवरून व्यक्त केलेले विचार ऐकताना मला असं वाटतं की, आपण सर्वांनी मला आपल्या कुटुंबाचा एक सदस्य मानलं आहे. ही गोष्ट माझ्यासाठी अतिशय सुखद अनुभूती देणारी आहे.

मित्रांनो, निवडणुका म्हणजे लोकशाहीचा एक सर्वात मोठा उत्सव असतो. आगामी दोन महिन्यामध्ये आपण सर्वजण निवडणुकीच्या धामधुमीमध्ये व्यस्त असणार आहोत. मी स्वतःही या निवडणुकीत एक उमेदवार असणार आहे. सुदृढ लोकशाही परंपरेचा आदर करून यानंतरची ‘मन की बात’ मे महिन्याच्या शेवटच्या रविवारी होईल. याचाच अर्थ मार्च महिना, एप्रिल महिना आणि पूर्ण मे महिना असे तीन महिने जाणार आहेत. या काळातल्या आपल्या सर्व भावनांविषयी निवडणुकीच्या नंतर एका नवीन विश्वासाने त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाच्या ताकदीच्या जोरावर पुन्हा एकदा ‘मन की बात’च्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधण्याचा कार्यक्रम आरंभ करणार आहे आणि अनेक वर्षे आपल्याशी ‘मन की बात’ करीत राहणार आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना अगदी हृदयापासून खूप- खूप धन्यवाद देतो.

***

S.Tupe/AIR/J.Patankar/P.Kor