Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ब्रिक्स व्यवसाय मंच 2026 मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा मराठी भाषेतील अनुवाद

ब्रिक्स व्यवसाय मंच 2026 मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा मराठी भाषेतील अनुवाद


 

महामहीम,

ब्रिक्स उद्योग व्यवसाय समुदायातील नेते,

नवोन्मेषक आणि मित्रहो,

नमस्कार!

ब्रिक्स व्यवसाय मंचाच्या या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत.

या वर्षी आपण ब्रिक्सची 20 वर्षे साजरी करत आहोत. 2006 मध्ये जेव्हा या समूहाची सुरुवात झाली होती, तेव्हा त्यात केवळ चार देश होते. आज ब्रिक्स आणि ब्रिक्स भागीदार मिळून, 21 देशांचे आपले कुटुंब आहे.

आज ब्रिक्सचे सदस्य देश जगातील 50% लोकसंख्या, 40% जीडीपी, आणि 25% पेक्षा जास्त व्यापाराचे प्रतिनिधित्व करतात. एवढेच नाही, तर या काळात, जिथे जागतिक जीडीपी सुमारे अडीच पट झाली आहे, अशावेळी ब्रिक्स देशांची एकत्रित जीडीपी सुमारे साडेचार पट झाली आहे. म्हणजेच, ब्रिक्सची आर्थिक ताकद जगाच्या तुलनेत सुमारे दुप्पट वेगाने वाढली आहे.

ब्रिक्स देश जागतिक नवोन्मेष आणि उपाययोजनांच्या बाबतीत महत्त्वाचे केंद्रही बनू लागले आहेत. तळागाळापासून ते आघाडीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत आपल्या देशांमध्ये नवोन्मेषाच्या नव्या शक्यता आकार घेत आहेत. ब्रिक्सची वाढती व्याप्ती, आणि आशावाद आपल्यात ठळकपणे दिसून येतो. भारतात आयोजित हा मंच, आतापर्यंतचा सर्वात मोठा ब्रिक्स व्यवसाय मंच आहे.

मित्रहो,

भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेची संकल्पना आहे, लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी. 

गेल्या 12 वर्षांत, भारताने या मंत्राला आपल्या आर्थिक आणि व्यापार धोरणाचा पाया बनवले आहे. लवचिकतेबद्दल बोलायचे तर, भारताने ऊर्जेपासून ते तंत्रज्ञानापर्यंत, पुरवठा साखळ्यांना अधिक वैविध्यपूर्ण आणि विश्वासार्ह बनवले आहे. याच लवचिकतेचा असा परिणाम घडून आला की, जागतिक पटलावर अनिश्चितता असतानाही, भारत आज प्रगती आणि स्थैर्याबद्दल विश्वास देऊ लागला आहे.

आम्ही रस्ते, रेल्वे, बंदरे आणि विमानतळांचा वेगाने विस्तार करत आहोत. सोबतच जहाज बांधणी, सेमीकंडक्टर, क्वांटम, अत्यावश्यक खनिजे आणि जैवतंत्रज्ञान यांसारख्या धोरणात्मक क्षेत्रांमध्ये नव्या क्षमता घडवत आहोत. या क्षेत्रांमध्ये भारत, जागतिक उद्योग व्यवसायांसाठी नव्या संधींचे केंद्र बनत आहे. म्हणूनच तर, ‘मेक इन इंडिया’, ‘इनोव्हेट विथ इंडिया’, आणि ‘स्केल फॉर द वर्ल्ड’.

मित्रहो,

आज भारतात एक स्टार्टअप क्रांती घडून येत आहे. 2 लाखांपेक्षा जास्त स्टार्टअप्स, आणि 120 पेक्षा जास्त युनिकॉर्न्ससह, भारत आज जागतिक उपाययोजनांचे केंद्र बनत आहे. याची एक झलक तुम्हाला ब्रिक्स भारत इनोव्हेट्स एक्स्पो मध्ये दिसून येईल.

आमचे स्टार्टअप्स, कृत्रिम बुद्धिमत्तेपासून ते शिक्षण आणि आरोग्य सेवा क्षेत्रात परिवर्त घडवून आणत आहेत, हरीत हायड्रोजन आणि बॅटरींवर काम करत आहेत, आणि संरक्षण तसेच अंतराळ क्षेत्रातही नवी क्षितिजे पार करत आहेत. आता आपल्याला ब्रिक्सच्या माध्यमातूनही, या जागतिक दर्जाच्या नवोन्मेषांना जागतिक बाजारपेठांपर्यंत पोहोचवायचे आहे.

मित्रहो,

भारताच्या नवोन्मेष गाथेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे – लोकसंख्येच्या व्याप्तीच्या प्रमाणात नवोन्मेष. भारताच्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसने (UPI) लोकसंख्येच्या व्याप्तीच्या प्रमाणात, आर्थिक समावेशन आणि डिजिटल व्यवहारांना नवी गती दिली आहे.

आज जगातील वास्तव वेळेतील 50% आर्थिक देवाणघेवाण, याच तंत्रज्ञानाने केली जाते. आणि या डिजिटल स्तरावर नव्या उपाययोजना विकसित करण्यासाठी, आम्ही उद्योगक्षेत्र आणि स्टार्टअप्सना एक खुली परिसंस्था दिली आहे. आम्हाला अभिमान आहे की भारताच्या या जागतिक दर्जाच्या परिसंस्थेला अनेक देश स्विकारत आहेत. ब्रिक्स देशांचे नवोन्मेषकही, या अनुभवाच्या आधारावर, आपल्या देशांसाठी नव्या उपाययोजना विकसित करू शकतात.

मित्रहो,

आज ज्यावेळी जगभरातील व्यापारासमोरचे अडथळे वाढत आहेत, भारत आर्थिक दुवा उभारत आहे. 2014 नंतर आम्ही जगातील सुमारे 40 देशांसोबत मुक्त व्यापार करार केले आहेत. ब्रिक्समध्येही आमचा दृष्टिकोन हाच आहे, अडथळे कमी करणे, आणि उद्योग व्यवसायांसाठीच्या संधी विस्तारणे.

म्हणूनच, आमच्या अध्यक्षतेखाली, आम्ही कृषी, आरोग्य, कौशल्ये आणि स्मार्ट-ग्रिड्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये, नव्या सहकार्याची व्यवस्था स्थापित केली आहे. स्टार्टअप्स तसेच लघू आणि मध्यम उद्योगांना, बाजारपेठा आणि वित्तीय क्षेत्राशी जोडण्याकरता, आम्ही ब्रिक्स इनक्यूबेटर नेटवर्क, ब्रिक्स एमएसएमई पोर्टल, आणि ब्रिक्स स्टार्टअप इनोव्हेशन फंड यांसारखे उपक्रम सुरू केले आहेत.

या सर्व सहकार्यात्मक आराखड्यांचा लाभ आपण सर्व जण घेऊ शकता. आणि आपल्या देशांदरम्यान गुंतवणूक तसेच कौशल्यांची देवाणघेवाण वाढवू शकता.

मित्रहो, 

जेव्हा सागरी मार्ग सुरक्षित असतील, पुरवठासाखळीचे  मार्ग खुले असतील आणि खलाशी सुरक्षित असतील, तेव्हाच जागतिक व्यापार पुढे जाऊ शकतो. आणि म्हणूनच, भारत नौकानयन स्वातंत्र्य आणि खलाशांच्या सुरक्षिततेचा खंबीर समर्थक आहे. 

ब्रिक्स महिला उद्योग आघाडी हा देखील आमच्या दृष्टीकोनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आमच्या विकासगाथेचे नेतृत्व महिला उद्योजकांनी करावे अशी आमची इच्छा आहे. भारतात झालेल्या या आघाडीच्या बैठकीत सुमारे 200 महिला उद्योजक सहभागी झाल्या याचा आम्हाला आनंद आहे. 

मित्रहो,

आज ब्रिक्स तिसऱ्या दशकात प्रवेश करत असताना ब्रिक्स व्यापार परिषदेला माझी कळकळीची विनंती आहे की,  ब्रिक्स देशांमधील व्यापारातील महत्वाचे असे 10 अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला एक अहवाल तयार करता येईल का? आपण दरवर्षी शंभर  ब्रिक्स स्टार्टअप्सना दुसऱ्या  ब्रिक्स बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यासाठी पाठिंबा देऊ शकतो का? आपण आपल्या व्यवसायांमध्ये हजारोच्या प्रमाणात नवीन भागीदारी विकसित करू शकतो का? या तीन मापदंड किंवा निकषांच्या आधारे आपल्याला दरवर्षी आपल्या प्रगतीचा आढावा घ्यावा लागेल. 

चला, आपण ब्रिक्सच्या महत्त्वाकांक्षेचे रूपांतर आपण  कृतीत करूया आणि सामूहिक शक्तीचे रूपांतर जागतिक उपायांमध्ये करूया. ब्रिक्सने स्वतःची प्रगती करत, जगाला देखील पुढे नेले पाहिजे. 

आपल्या सर्वांचे खूप खूप आभार!

***

हर्षल अकुडे/तुषार पवार/सविता म्हसकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]