Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारताच्या मदतीने संपूर्ण श्रीलंकेत आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेचा विस्तार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ लिंक द्वारे केलेले संबोधन


भारताच्या मदतीने संपूर्ण श्रीलंकेत आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेचा विस्तार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ लिंक द्वारे  संबोधन केले.

श्रीलंकेचे पंतप्रधान,रनिल विक्रमसिंघे, जाफना इथून यामध्ये सहभागी झाले.

पंतप्रधानांचे संबोधन–

माझे मित्र आणि श्रीलंकेचे पंतप्रधान,रनिल विक्रमसिंघे,

प्राध्यापक मैत्री  विक्रमसिंघे,

श्रीलंकेचे मंत्रीगण,

भारताचे श्रीलंकेतले उच्चायुक्त,

उत्तरी प्रांताचे मुख्यमंत्री,

श्रीलंकेचे संसद सदस्य,

आदरणीय धार्मिक नेते,

मान्यवर अतिथी,

आणि मित्रहो,

नमस्कार

अयुबोवान

वणक्कम

जाफना इथे आपल्याशी थेट व्हिडिओ लिंकद्वारे संवाद साधताना मला आनंद होत आहे.

राष्ट्रीय आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा संपूर्ण श्रीलंकेत पोहचणार असल्याचा मला अधिक आनंद आहे.भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या विकासात्मक भागीदारीतली ही आणखी एक महत्वाची घटना आहे.

2015 च्या माझ्या श्रीलंका भेटीत मित्र,पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी, श्रीलंकेत अशी यंत्रणा उभारण्याबाबत माझ्याशी बातचीत केली होती.

जुलै 2016 मध्ये या सेवेचा पहिला टप्पा पश्चिमी आणि दक्षिणी प्रांतात सुरु झाला याचा मला आनंद आहे.

श्रीलंकेच्या गेल्या वर्षीच्या माझ्या भेटीत इथल्या जनतेला,आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेची व्याप्ती संपूर्ण श्रीलंकेमध्ये वाढवण्याचे वचन दिले होते.

भारताने कालबद्ध रीतीने आपली वचनपूर्ती केली आहे याचा मला आनंद  आहे.आज या सेवेचा दुसरा टप्पा सुरु होत आहे.

उत्तरी प्रांतापासून या टप्प्याचा विस्तार सुरु झाला आहे याचा मला आनंद आहे.अडचणीच्या काळात  आपल्या समवेत राहून उज्वल भविष्यासाठी आपल्यासमवेत काम करताना भारताला आनंद आहे.

या सेवेशी संबंधित मनुष्यबळाला भारतात प्रशिक्षण देण्यात आले आहे. आवश्यक कौशल्य आणि स्थानिक रोजगारालाही  चालना मिळणार आहे.

मित्रहो,

पहिली  प्रतिसाद सेवा आणि त्याचा विस्तार करण्यात भारत हा श्रीलंकेचा विशेष भागीदार आहे हा निव्वळ योगायोग नाही.

चांगल्या आणि कठीण अशा दोनही काळात भारताने प्रथम  प्रतिसाद दिला आहे आणि भविष्यातही भारताची हीच भूमिका राहील.वैविध्यतेने नटलेल्या दोन लोकशाहीचे नेते या नात्याने मी आणि विक्रमसिंघे,आमचा दोघांचाही, विकासाचे  लाभ समाजातल्या सर्व स्तरापर्यंत पोहोचवण्यावर विश्वास आहे,

श्रीलंकेतल्या सर्व स्तरातल्या नागरिकांच्या आशा-आकांक्षा  पूर्ततेसाठी राष्ट्राध्यक्ष सिरीसेना आणि विक्रमसिंघे यांच्या प्रयत्नांची मी प्रशंसा करतो.

मित्रहो,

पंतप्रधान या नात्याने श्रीलंकेला दोनदा भेट दिली त्याच्या स्नेहपूर्ण आठवणी माझ्याकडे आहेत.आपण केलेल्या स्नेहाच्या वर्षावाने मी भारावून गेलो आहे.

जाफनाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान होण्याचे भाग्य मला लाभले.वेसाक दिन कार्यक्रमातही मी गेल्या वर्षी सहभागी झालो होतो.या अविस्मरणीय आठवणी आहेत.

मित्रहो,प्रत्येक राष्ट्राचे अस्तित्व हे त्याच्या शेजाऱ्याशी निगडित असते.

श्रीलंकेकडे केवळ शेजारी म्हणून मी पाहत नाही तर दक्षिण आशिया आणि हिंदी महासागर परिवारातील भारताचा  एक विशेष आणि विश्वासू भागीदार म्हणून पाहतो.

श्रीलंकेबरोबर आमचे विकासात्मक सहकार्य हे प्रगती आणि विकास वास्तवात रूपांतरित करण्याचे महत्वाचे साधन आहे असा माझा विश्वास आहे.

तीन वर्षांपूर्वी श्रीलंकेच्या संसदेला संबोधित करण्याचा सन्मान  मला मिळाला होता त्यावेळी मी शेजार हा घनिष्ट संबंधात रूपांतरित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाय योजना करण्याच्या गरजेबाबत मी बोललो होतो.

1927 मध्ये महात्मा गांधी यांनी,जाफना स्टुडंट काँग्रेसच्या निमंत्रणावरून,श्रीलंकेला भेट दिली होती तेव्हा त्यांनी काय सांगितले होते याचे मला स्मरण होते.तेव्हा त्यांनी  दक्षिणेकडच्या मातारा ते उत्तरेकडच्या पॉईंट पेड्रो असा प्रवास केला.तालाईमन्नार मार्गे परतताना,जाफना  इथल्या स्वागत समितीशी बोलताना ते म्हणाले “जाफनासाठी,संपूर्ण सिलोनीसाठी माझा संदेश आहे की, दृष्टीक्षेपापासून,मनापासून दूर जाऊ नका.”

माझाही आज हाच संदेश आहे.आपल्या जनतेने सातत्याने एकमेकांच्या संपर्कात राहिले पाहिजे.यामुळे आपण एकमेकांना उत्तम जाणून घेऊन अधिक  घनिष्ट मित्र बनू.

आपण भारतात यावे आणि  साकारत असलेला नव  भारत अनुभवावा यासाठी माझे आपणाला प्रोत्साहन राहील.

पंतप्रधान विक्रमसिंघे ,ऑगस्टच्या सुरवातीला भारताला भेट देणार आहेत याचा मला आनंद आहे.आपला प्रवास सुखाचा व्हावा आणि भारतातले आपले वास्तव्य आनंददायी ठरावे अशी आशा मी व्यक्त करतो.

धन्यवाद. अनेक अनेक आभार.

 

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar