Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

माननीय पंतप्रधानांनी इराणमधील ‘‘भारत आणि इराण, दोन महान नागरी संस्कृतीः सिंहावलोन आणि परिदृश्य’’ या परिषदेच्या उद्‌घाटन प्रसंगी दिलेले भाषण

माननीय पंतप्रधानांनी इराणमधील ‘‘भारत आणि इराण, दोन महान नागरी संस्कृतीः सिंहावलोन आणि परिदृश्य’’ या परिषदेच्या उद्‌घाटन प्रसंगी दिलेले भाषण

माननीय पंतप्रधानांनी इराणमधील ‘‘भारत आणि इराण, दोन महान नागरी संस्कृतीः सिंहावलोन आणि परिदृश्य’’ या परिषदेच्या उद्‌घाटन प्रसंगी दिलेले भाषण


फरहिंगस्तानचे प्रमुख सन्माननीय हदिद आदेल, इराणचे सांस्कृतिक व्यवहारमंत्री डॉ. जनाती, मान्यवर विद्वान- अभ्यासक, प्रतिष्ठीत महिला आणि सज्जनमंडळी……माझ्या या भाषणापूर्वी डॉ. आदेल आणि डॉ. जनाती यांच्या उद्बोधनातून या परिषदेची दिशानिश्चिती झाली आहे. परिषदेसाठी हा काळही आदर्श आहे. गेल्या शतकापासूनचे उभय देशांचे संबंध अधिक सदृढ करून त्यामध्ये आणखी ताजेपणा आणण्यासाठी याच्यापेक्षा अधिक काळ आहे. आपल्या समाजातील पुरोगामी विचारसरणीची शिकवण बुद्धिवादी वर्गाच्या विचारांना प्रतिसाद देण्याच्या दृष्टीनेही ही परिषद उपयुक्त ठरणार आहे. आजच्या युवापिढीला आपल्या श्रीमंत, मौल्यवान सांस्कृतिक वारशाचा परिचय करून देण्याची जबाबदारीही आपण पार पाडली पाहिजे. या परिषदेत सहभागी झालेली विव्दान मंडळीच हे काम उत्कृष्टतेने करू शकतील. त्यांच्याइतके चांगले कार्य इतर कोणीही करू शकणार नाही. आजच्या काळाची नेमकी गरज ओळखून आवश्यकतेनुसार बदल स्वीकारण्याची सिद्धता करणारे डॉ. अदेल, यांचे विशेष अभिनंदन मला आवर्जून केले पाहिजे. भारतीय उपखंडाविषयी पर्शियनमध्ये माहितीचा खजिना उपलब्ध करून देणाऱ्या ज्ञानकोशाच्या निर्मितीचे त्यांचे कार्य सुरू आहे. या प्रकल्पामुळे संशोधक आणि अभ्यासक विव्दानांची महान सेवा केली जात आहे. इराणमधील बुद्धिजीवि आणि विचारवंताचा हा सन्मान आहे.

मित्रांनो,

आज संपूर्ण जगभरामध्ये राजकीय विशेषज्ञ चतुराईने, अगदी व्यूहरचना करून केंद्रीत होण्याच्या, जवळ येण्याची भाषा करत आहेत. परंतु भारत आणि इराण या दोन्ही नागरी वसाहती एकत्र येऊन या परिषदेव्दारे आपली महान संस्कृती साजरी करत आहे. आत्ताच, काही क्षणांपूर्वी ‘कलिलेह-वा-दिमेह’च्या पर्शियन हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. यामध्ये भारत आणि इराण यांना जोडणाऱ्या ऐतिहासिक ऋणानुबंधाचे दाखले सादर केले आहेत. भारतामध्ये प्रचलित असणाऱ्या जातककथा आणि पंचतंत्राच्या साध्या, सोप्या गोष्टी आता पर्शियनमध्ये ‘‘कलिलेह-वा-दिमेह’ च्या रुपाने आल्या आहेत. दोन भिन्न समाजाच्या संस्कृतीच्या देवाणघेवाणीचा आणि वेगळ्या वाटेने केलेल्या प्रवासाचा हा एक आदर्श , वाखाणण्याजोगा नमुना आहे. उभय देश आणि दोन्ही संस्कृती एकाच मार्गाने कशा पद्धतीने विचार करतात, याचे हे एक सुंदर उदाहरण म्हणजे प्रस्तूत पुस्तक मानता येईल. यामध्ये आपल्या संस्कृतीमधील प्राचीन ज्ञानाचे यथार्थ दर्शन घडते.
भारतातून आलेल्या साखरेविषयी आणि मनापासून गोड आवडणाऱ्या लोकांसाठी…खास या समारंभासाठी म्हणून राखून ठेवलेल्या,… हाफेजच्या दोन ओळी माझ्या स्मरणात आहेत त्या इथे उदधृत करतो. ….

शक्कर-शिकन शवंद हमे बुलबुलाने-अजम

जे ईन कदे- हिन्दी कि बे-तेहरान मी रसद्

( अर्थ — इराणच्या सर्व बुलबुल पक्ष्यांनो,……भारतातून तेहरानला आलेल्या साखरेसारख्या गोड अशा या ताज्या मिठाईचा स्वाद घ्या….)

मित्रांनो,

ही शतके हे आपल्या कल्पना आणि परंपरा, काव्य आणि कलाकारी, कला आणि स्थापत्यकला, संस्कृती आणि वाणिज्य यांची मुक्त देवाणघेवाण करून उभय नागरी सभ्यता अधिक समृद्ध करण्याचे युग आहे. आपल्या देशांची आर्थिक वृद्धी करण्यासाठी आपला परंपरागत वारसा हे मजबूत स्त्रोत बनू शकतो. समृद्ध पर्शियन परंपरा हा भारतीय वस्त्रोद्योगाचा एकात्मिक भाग आहे. इराणी संस्कृती आम्हा भारतीयांच्या हृदयामध्ये जणू वसली आहे; आणि अगदी त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीचा एक भाग इराणी संस्कृतीमध्ये विणला जातोय. आपल्या प्राचीन महाकाव्यातून आढळणारा, चित्रित केलेला नायक पाहिला तर दोघेही अगदी समांतर जातात. भारतातील अजमेर शरीफचा दर्गा आणि हजरत निझामुद्दिन यांच्यासारखीच स्थाने इराणमध्येही आहेत. दोन्हींमध्ये कमालीचे साम्य आहे. महाभारत आणि शहनामा , भीम आणि रूस्तम, अर्जुन आणि अर्श यांच्यातील साम्यस्थळांमुळे त्या त्या काळातील; आपल्या जगातील संकल्पना आणि मूल्ये प्रदर्शित करतात. झरदोजी, गुलदोजी, आणि चंदेरी यासारख्या कला कदाचित इराणी समाजाचा भाग असू शकतात. आज ही कलाकारी भारतातही तितकीच लोकप्रिय बनली आहे. इराणी संस्कृतीच्या समृद्ध वारशाचा विचार केला जात असताना पर्शियन सुंदर काव्यपरंपरेचा विसर कोणालाही पडणार नाही. भारतात तर आम्ही या काव्याला आधीच आपलेसे केले आहे. भारतातील मध्ययुगीन कवींनी पर्शियन आणि संस्कृत या दोघी भाषाभगिनी असल्याचे नमूद केले आहे. भारतीय धार्मिक महाकाव्य रामायणाचे डझनभरापेक्षा जास्त अनुवाद पर्शियनमध्ये झाले आहेत. या महाग्रंथामध्ये जवळपास 250 पर्शियन शब्द आहेत. भारतामध्ये मध्ययुगात ही वास्तविक न्यायालयीन भाषा होती. परंतु ते लेखन अगदी मनापासून केले गेल्यामुळे लोकांमध्ये प्रिय झाले. भारतातल्या जवळपास 40 विद्यापीठांमध्ये गेल्या 75 वर्षांपासून पर्शियन शिकवले जाते. भारतातल्या खाजगी आणि सार्वजनिक संग्रहालयांमध्ये पाच दशलक्ष पर्शियन हस्तलिखितांचे जतन करून ठेवण्यात आले आहे. तर राष्ट्रीय आणि राज्य पुरातत्व खात्यांकडे 20 दशलक्षांपेक्षा जास्त पर्शियन दस्तऐवज आहेत. विशेष म्हणजे, यापैकी बहुतांश दस्तऐवज इराणी सुलेखनकारांनी लिहिलेले आणि भारतीय चित्रकारांनी चितारलेले आहेत. यावरून उभय राष्ट्रांच्याे संयुक्त परंपरेचे दर्शन घडते. हैदराबादच्या सालार जंग वस्तुसंग्रहालयामध्ये अशा प्रकारचे संयुक्त दस्तऐवज मोठ्या संख्येने जतन करून ठेवण्यात आले आहेत. भारतामध्ये सध्या सगळ्या दस्तऐवजांचे डिजिटायझेशनचे महत्वपूर्ण काम हाती घेण्यात आले आहे. त्यामध्ये पर्शियन दस्तऐवजांचाही समावेश आहे. भारतामध्ये दरवर्षी एका पर्शियन गुणवंताचा सन्मान भारताच्या राष्ट्रपतींच्यावतीने करण्यात येतो.

बंधू आणि भगिनींनो,

दोन प्राचीन सभ्यता आणि संस्कृती, म्हणून आपल्याला स्वतःमधील अपार क्षमतांची कल्पना आहेच आणि आपण परकीय संस्कृतीचेही स्वागत करीत आहोत. आपली संस्कृती अधिक मजबूत व्हावी ,एवढाच या संबंधांचा हेतू अथवा उद्देश नाही. वैश्विक पातळीवर सामाजिक सहिष्णुता वृद्धीस लागावी, यासाठी आपले योगदान देण्याची आवश्यकता आहे. आपल्या प्राचीन ऋणानुबंधाचा धागा सुफीझम अधिक मजबूत करणारा घटक आहे. अखिल मानवजातीचा सहज स्वीकर, खरे-विशुद्ध प्रेम आणि सहिष्णुता यांचा संदेश सुफी तत्वज्ञानातून दिला जातो. याचेच प्रतिबिंब ‘वसुधैव कुटुम्बकम्’ अर्थात “संपूर्ण विश्व एक कुटूंब आहे” , या भारतीय संकल्पनेमध्ये दिसते.

मित्रांनो,

भारत आणि इराण हे सदैव भागिदार आणि मित्रही आहेत. इतिहासामध्ये डोकावले तर या नात्यांने काही चढ-उतार नक्कीच अनुभवले आहेत. परंतु भागिदारीचा विचार केला तर उभय देशांचे संबंध दृढ होत गेले असे सहजच म्हणता येईल. आपले ऋणानुबंध अधिक मजबूत करून, त्यांना पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करण्यासाठी त्या दिशेने संयुक्तपणे मार्गक्रमण करण्याची आता वेळ आली आहे. या वाटचालीमध्ये आपल्यासारखे मान्यवर ज्ञानवंत फार महत्वाची भूमिका बजावू शकतात. ‘‘भारत आणि इराण, दोन महान नागरी संस्कृतीः सिंहावलोन आणि परिदृश्य’’ या परिषदेचे उद्घाटन करण्याचे सौभाग्य मला लाभले, याचा मला अत्यानंद होत आहे.

परिषदेच्या यशस्वीतेसाठी माझ्या मनापासून शुभेच्छा. आपल्या या चर्चेतून काही नवकल्पनांचा जन्म व्हावा, असेही मला मनापासून वाटते. आयसीसीआर आणि फरहिंगिस्तान यांनी या परिषदेच्या आयोजनासाठी केलेल्या संयुक्त कार्याबद्दल मला खूपच आनंद झाला आहे. तुमच्या या प्रयत्नांमुळेच उभय देशांमध्ये साहित्यिक, शैक्षणिक आणि थेट माणसाला माणूस जोडणारा मजबूत दुवा निर्माण होत आहे.

मला आमंत्रित केल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार. तुम्हां सर्वांना आणि परिषदेला शुभेच्छा…

शुक्रान, धन्यवाद.

S.Bedekar/B. Gokhale