Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

विकसित भारताच्या पुढील झेपेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातून आवाहन

विकसित भारताच्या पुढील झेपेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातून आवाहन


 

80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 सालापर्यंत भारताला विकसित भारत बनविण्याच्या प्रवासाला वेग देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण आवाहने केली. देशाची कार्यसंस्कृती, विचारसरणी आणि महत्त्वाकांक्षेची व्याप्ती बदलण्याची गरज अधोरेखित करताना पंतप्रधानांनी नागरिक, सरकार, उद्योग, शेतकरी, युवक आणि समाजातील इतर घटकांना सामूहिक कृती करण्याचे आवाहन केले.

पंतप्रधानांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे :

1. पुढील टप्प्यातील सुधारणा

पंतप्रधानांनी सुधारणांचा वेग वाढवण्याचे आवाहन केले. भारतासाठी सुधारणा ही सक्तीची बाब नाही, किंवा केवळ चर्चेतील संज्ञा नाही, तर ती दृढ विश्वासाची बाब आहे, असे त्यांनी सांगितले. सरकार, समाज, उद्योग, उत्पादक आणि शेतकरी या सर्वांनी पारंपरिक व्यवस्था, विचारसरणी आणि उद्दिष्टांमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि उद्योगांनी एकत्रितपणे पुढे जात सातत्याने सुधारणा कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. 2047 वर्षासाठीच्या आकांक्षांनुसार व्यवस्था, धोरणे आणि नियम निश्चित केले पाहिजेत, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

2. विकसित भारतासाठी ‘सप्तधारा’

भारताला नव्या उंचीवर नेण्यासाठी आणि आगामी 5 ते 7 वर्षांत देशाला नवी गती देण्यासाठी पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून सामर्थ्याच्या सात प्रवाहांचे, म्हणजेच ‘सप्तधारेचे’, आवाहन केले. हे सात प्रवाह पुढीलप्रमाणे आहेत :

उत्पादन सामर्थ्य :

भारताने घटकनिर्मिती आणि रचना-कल्पनेपासून ते उत्पादनांच्या निर्मितीपर्यंत संपूर्ण मूल्यसाखळी विकसित करून जागतिक पुरवठा साखळीचे विश्वासार्ह केंद्र बनले पाहिजे. खर्च, गुणवत्ता आणि उत्पादनाचे प्रमाण, स्पर्धात्मक कारखाने, वापरण्यास सुलभ उत्पादने, आकर्षक पॅकेजिंग आणि दोषरहित अचूक उत्पादन यावर पंतप्रधानांनी भर दिला. गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करण्याचे आवाहन करताना भारतीय उत्पादन क्षेत्राचा मंत्र “गुणवत्ता, गुणवत्ता, गुणवत्ता” असला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

कृषी आणि अन्न उत्पादन :

शेतापासून निर्यात बाजारपेठेपर्यंतचा प्रवास साध्य करून भारतातील पारंपरिक खाद्यपदार्थ, भरडधान्ये, मसाले, फळे आणि फुले यांना जागतिक ब्रँड बनविण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. रसायनमुक्त शेती आणि जागतिक निकषांची पूर्तता करणाऱ्या कृषी उत्पादनांवरही त्यांनी भर दिला.

तंत्रज्ञान आणि नवोन्मेष :

कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम तंत्रज्ञान, अंतराळ तंत्रज्ञान, रोबोटिक्स आणि माहिती केंद्रे यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांचा संदर्भ देत भारताने केवळ जगाची बाजारपेठ न राहता नवोन्मेषाचे केंद्र बनले पाहिजे, असे पंतप्रधानांनी सांगितले. भारतात निर्मित 6G देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे हे देशाचे उद्दिष्ट असले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

गतिशक्ती :

शहरांना जोडणारी अतिवेगवान रेल्वे, आधुनिक महामार्ग, अंतर्देशीय जलमार्ग, विमानतळ आणि बहुपद्धती वाहतूक-रसद व्यवस्था यांच्या माध्यमातून अखंड आणि वेगवान संपर्कव्यवस्था निर्माण करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. बंदरे केवळ मालाची चढ-उतार करणारी केंद्रे न राहता बंदर-आधारित विकास आणि आर्थिक वृद्धीची वाहक बनली पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

संरक्षण सामर्थ्य :

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचे आवाहन करताना भारताने अद्ययावत संरक्षण तंत्रज्ञान विकसित करून जागतिक संरक्षण साहित्य पुरवठादार बनण्याच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे, असे पंतप्रधानांनी सांगितले. विशेषतः ड्रोन आणि ड्रोनविरोधी प्रणाली विकसित करण्याबरोबरच अतिवेगवान क्षेपणास्त्रविरोधी संरक्षण तंत्रज्ञानात नेतृत्व करण्याचे त्यांनी आवाहन केले. सायबर सुरक्षा हे देखील असे क्षेत्र आहे, जिथे भारतीय युवकांच्या क्षमतांचा भारतासाठी आणि जगासाठी उपयोग केला जाऊ शकतो, असे त्यांनी अधोरेखित केले.

हरित अर्थव्यवस्था आणि नील अर्थव्यवस्था :

हरित हायड्रोजन, नवीकरणीय ऊर्जा, ऊर्जा साठवणूक, हरित वाहतूक आणि हरित उत्पादन या क्षेत्रांमध्ये जागतिक स्तरावर भारताने स्थान निर्माण करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. भारताच्या विस्तीर्ण किनारपट्टीमुळे मत्स्यव्यवसाय, किनारी पर्यटन, सागरी तंत्रज्ञान आणि नील अर्थव्यवस्थेतील इतर क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या संधींकडेही त्यांनी लक्ष वेधले.

भारताचे सांस्कृतिक सामर्थ्य :

योग, आयुर्वेद, सर्वांगीण आरोग्यसेवा आणि ‘भारतामध्ये उपचार’ या भारताच्या सामर्थ्यांना जगभर पोहोचविण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. हस्तकला, संस्कृती, चित्रपट, दृश्य परिणाम तंत्रज्ञान, चलच्चित्र निर्मिती, खेळाधारित मनोरंजन आणि डिजिटल आशय या क्षेत्रांमध्येही भारत जागतिक स्तरावर आपले सामर्थ्य प्रस्थापित करू शकतो, असे त्यांनी सांगितले.

भारतामध्ये परदेशी पर्यटक, जागतिक क्रीडा स्पर्धा आणि मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना आकर्षित करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

भारताच्या आकांक्षा व्याप्तीत वाढ :

देशाला मोठा विचार करण्याचे आवाहन करताना, येत्या दशकात भारताच्या 50 कंपन्या फॉर्च्यून 500 मध्ये का असू नयेत, असा प्रश्न पंतप्रधानांनी विचारला. ते म्हणाले की जगातील पहिल्या पाच बँकांमध्ये एका भारतीय बँकेचा समावेश असायला हवा आणि जगातील पाच मोठ्या औषध निर्मीती कंपनींमध्ये एक किंवा दोन भारतीय  कंपनींनी स्थान मिळवायला हवे. त्यांनी भारतीय कायदा कंपनी, मानांकन संस्था, सल्लागार कंपनी आणि लेखापाल कंपनींनी जगातील आघाडीच्या कंपनी म्हणून उदयास येण्याचे, भारतीय तंत्रज्ञान कंपनींना जागतिक नेते बनण्याचे आणि भारतीय प्रसिद्ध कंपनींना जगाला आकर्षित करणारी देशाची ओळख बनण्याचे आवाहन केले.

भारतीय गुणवत्तेला जागतिक ओळख मिळावी :

पंतप्रधानांनी उत्पादक, उद्योजक आणि एमएसएमईंना जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांची विश्वासार्हता आणि गुणवत्ता हीच ओळख बनवण्याचे आग्रही  आवाहन केले. ते म्हणाले की भारताने किंमत, गुणवत्ता आणि व्याप्ती या बाबतीत जागतिक मानके पूर्ण केली पाहिजेत आणि जागतिक बाजारपेठेत यशस्वीपणे स्पर्धा करू शकतील अशी उत्पादने सादर केली पाहिजेत. त्यांनी एमएसएमईंना भारताच्या व्यापार करारांमुळे निर्माण झालेल्या संधींचा फायदा घेण्याचे, आणि गुणवत्ता आणि स्पर्धात्मकतेच्या जागतिक निकषांची पूर्तता करत भारतीय उत्पादने जागतिक बाजारपेठेत नेण्याचे आवाहन केले.

कार्यसंस्कृती बदला आणि भारताच्या उद्दिष्टांच्या व्याप्तीशी मेळ घाला :

पंतप्रधानांनी सांगितले की या शतकाचा पुढचा पाऊण भाग भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि देश थांबू शकत नाही किंवा आपला वेग कमी होऊ देऊ शकत नाही. त्यांनी देशाची कार्यसंस्कृती, विचार आणि कामाचा वेग बदलण्याचे आवाहन केले आणि सांगितले की जी कामे गेल्या पाच-सात दशकांत पूर्ण झाली नव्हती, ती येत्या पाच-सात वर्षांत पूर्ण करावी लागतील.

नशामुक्त भारत – प्रत्येक कुटुंबाने सामील झाले पाहिजे :

अंमली पदार्थांचे व्यसन हे भारताच्या तरुणांसमोरील एक मोठे आव्हान असल्याचे सांगून पंतप्रधानांनी स्पष्ट केले की नशामुक्त भारत ही एक सामूहिक जबाबदारी बनली पाहिजे. `माय भारत` स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक-सांस्कृतिक संस्था आणि आध्यात्मिक नेत्यांचा समावेश असलेल्या 100 आठवड्यांच्या नशामुक्त भारत मोहिमेचा संदर्भ देत त्यांनी प्रत्येक कुटुंबाला या मोहिमेचा भाग बनण्याचे आणि नशामुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.

महिला आरक्षणाची अंमलबजावणी करा :

पंतप्रधानांनी सर्व राजकीय पक्षांना महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी एकत्र येण्याचे थेट आवाहन केले. नारी शक्ती वंदन अधिनियमाचा उल्लेख करत त्यांनी राजकीय पक्षांना लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के प्रतिनिधित्व लवकरात लवकर मिळेल याची खात्री करण्याचे आणि भारताच्या धोरणांना आकार देण्यात योगदान देण्यास सक्षम करण्याचे आवाहन केले.

जनगणनेतील सहभागाचे नेतृत्व तरुणांनी करावे :

धोरणे, योजना आणि देशाच्या भविष्यकालीन नियोजनासाठी अचूक माहिती आवश्यक आहे यावर भर देत पंतप्रधानांनी तरुणांना सध्या सुरू असलेल्या जनगणनेत त्यांच्या कुटुंबांना अचूकपणे सहभागी होण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. त्यांनी तरुणांना आपल्या कुटुंबासोबत बसून, अर्ज समजून घेण्यास, भरलेली माहिती बरोबर असल्याची खात्री करण्याचे आणि जनगणना मोहिमेत सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.

स्वतःपेक्षा देश श्रेष्ठ; कर्तव्य हीच ओळख :

पंच प्रणांचे स्मरण करून देत पंतप्रधानांनी नागरिकांना गुलामगिरीची मानसिकता नष्ट करत राहण्याचे आवाहन केले आणि राष्ट्रहित हे स्वतःपेक्षा महत्वाचे असले पाहिजे आणि कर्तव्य हीच आपली ओळख बनली पाहिजे या संकल्पाचा पुनरुच्चार केला.

स्वप्नांचे संकल्पात आणि संकल्पाचे यशात रूपांतर करा :
विकसित भारताच्या दिशेने सामूहिक राष्ट्रीय प्रयत्न करण्याचे आवाहन करत पंतप्रधानांनी सांगितले की वेळ, संधी आणि संकल्प भारताचे आहेत. नागरिकांनी आपल्या स्वप्नांचे संकल्पात, संकल्पाचे सामर्थ्यात आणि सामर्थ्याचे यशात रूपांतर करावे; प्रत्येक पाऊल विकासाच्या दिशेने टाकावे; एकत्रितपणे पुढे जावे आणि सामूहिक प्रयत्नांतून विकसित भारताची निर्मिती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

***

माधुरी पांगे/निखिलेश चित्रे/नितीन गायकवाड/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai