पीएम्इंडिया
नवी दिल्ली,20 मे 2026
माननीय महोदय, पंतप्रधान मेलोनी,
दोन्ही देशांचे प्रतिनिधी,
माध्यमांचे सहकारी,
नमस्कार!
बोनजोर्नो!
माझे आणि माझ्या शिष्टमंडळाचे भव्य स्वागत केल्याबद्दल मी पंतप्रधान मेलोनी यांचे मनापासून आभार मानतो.
रोम, हे जगातील शाश्वत शहर म्हणून ओळखले जाते. भारतातील माझा लोकसभा मतदारसंघ, काशी, हे देखील एक शाश्वत आणि चिरंतन शहर मानले जाते. जेव्हा दोन संस्कृती एकत्र येतात, तेव्हा संवाद केवळ कार्यक्रम पत्रिकेपुरता मर्यादित राहत नाही. यामध्ये इतिहासाची खोली, भविष्याची दूरदृष्टी आणि मैत्रीची सहजता, या तिन्ही गोष्टी एकत्र दिसून येतात.
मित्रहो,
गेल्या साडेतीन वर्षात पंतप्रधान मेलोनी यांना अनेकदा भेटण्याची संधी मला मिळाली. यामधून भारत आणि इटली यांच्यातील घनिष्ट सहकार्य आणि सौहार्द दिसून येते. त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या संबंधांना नवी गती, नवी दिशा आणि नवा आत्मविश्वास मिळाला आहे. मला आनंद आहे की, आपण आपले संबंध आणखी दृढ करत, विशेष धोरणात्मक भागीदारीची घोषणा करत आहोत.
मित्रहो,
आजच्या बैठकीत आम्ही भविष्यातील भागीदारी अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर सविस्तर चर्चा केली. भारत-इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 या भागीदारीला एक व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट प्रदान करतो. आम्ही कालबद्ध रीतीने या दिशेने पुढे जात आहोत. आमच्या संयुक्त प्रयत्नांमुळे, द्विपक्षीय व्यापार वीस अब्ज युरोच्या उद्दिष्टाकडे वेगाने वाटचाल करत आहे.
भारतात कार्यरत असलेल्या आठशेहून अधिक इटालियन कंपन्या भारताच्या विकास गाथेत सक्रिय भागीदार बनत आहेत. आज आयोजित होत असलेल्या व्यावसायिक चावरून हे स्पष्ट होते की, दोन्ही देशांच्या उद्योजकांमध्ये एक नवा उत्साह, नवा आत्मविश्वास आणि नवी महत्वाकांक्षा आहे. इटली, जगामध्ये डिझाइन आणि अचूकतेसाठी ओळखला जातो.
भारताची ओळख कौशल्य, बुद्धीमत्ता आणि किफायतशीर नवोन्मेष यांचा ऊर्जास्रोत अशी आहे. यासाठी आम्ही उत्पादने भारत आणि इटलीमध्ये डिझाईन आणि विकसित होऊन जगासाठी आणणे या धोरणाला पुढे नेणार आहोत. यामध्ये फॅशनपासून ते फिनटेक पर्यंत, चामड्यापासून ते मालवाहतूकीपर्यंत आणि मोबिलीटी पासून ते उत्पादनापर्यंत सर्वच क्षेत्रात आमच्या सामर्थ्यस्थळांना एकत्र करुन मानवतेच्या भल्यासाठी काम करणार आहोत.
भारत युरोपिय महासंघ मुक्त व्यापार कराराला अंतिम रूप देण्याकरिता केलेल्या सहकार्यासाठी मी इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्या विषयी विशेष आभार व्यक्त करत आहे. आम्ही एकत्र येऊन लवकरच अंमलबजावणीसाठी काम करु, जेणेकरुन व्यावसायिक समुदाय याचा पूर्ण लाभ घेऊ शकतील.
मित्रहो,
तंत्रज्ञान आणि नवोन्मेष हे आमच्या भागीदारीचे सूत्र आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता, क्वांटम, अंतराळ आणि नागरी अणुऊर्जा, यासारख्या क्षेत्रात भागीदारीच्या अनेक संधी आहेत. दोन्ही देशांच्या स्टार्टअप, संशोधन केंद्रे आणि उद्योगांना आपापसात जोडून घेण्यासाठी आम्ही भारत इटली नवोन्मेश केंद्रावर काम करत आहोत.
मित्रहो,
सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रामधील घनिष्ट सहकार्य हे आमच्या परस्पर विश्वासाचे प्रतिक आहे. आमच्या सैन्याबरोबरच दोन्ही देशांमध्ये संरक्षण उद्योगामध्येही सहकार्य वाढत आहे. आमच्या संरक्षण औद्योगिक आराखड्यामुळे सहविकास आणि सह उत्पादनाचा मार्ग अधिक प्रशस्त झाला आहे.
सागरी शक्तीया रूपाने भारत आणि इटली यांच्यामध्ये संपर्क क्षेत्रात निकट सहकार्य नैसर्गिक आहे. आम्ही एकत्र येऊन जहाजव्यवसाय, बंदरांचे आधुनिकीकरण, मालवाहतूक आणि नील अर्थव्यवस्थेवर काम करु.
आम्ही आमची यशस्वी भागीदारी तिसऱ्या देशांपर्यंत घेऊन जाण्याबाबतही चर्चा केली आहे. या दिशेने पुढे पाऊल टाकण्यासाठी आम्ही अफ्रिकेत मोठ्या प्रकल्पांवर एकत्र काम करण्याबाबतही आमचे एकमत झालेले आहे.
मित्रहो,
भारत आणि इटली मध्ये या बाबत एकमत झाले आहे की, दहशतवाद हे मानवतेसमोरचे गंभीर आव्हान आहे. दहशतवादाला अर्थपूरवठा करण्याच्या विरोधात आम्ही एकत्रित येऊन घेतलेल्या पुढाकाराने संपूर्ण जगासमोर एक उदाहरण ठेवले आहे. भारत आणि इटलीने हा स्पष्ट संदेश दिला आहे की, जबाबदार लोकशाही केवळ दहशतवादाचा निषेधच करत नाही तर त्यांचे आर्थिक जाळे तोडण्यासाठी ठोस पावलेही उचलते. युक्रेन, पश्चिम आशिया त्याचबरोबर इतर तणावाबाबत आम्ही सातत्याने संपर्क साधून आहोत. भारत हे स्पष्ट करतो की कोणत्याही समस्येचे समाधान संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातूनच व्हायला हवे.
मित्रहो,
दोन्ही देशांचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि लोकांचे एकमेकांशी असलेले संबंध जागोजागी दिसून येतात. इटलीमध्ये भारतीय कला, योग, आयुर्वेद आणि खाद्यसंस्कृतीमध्ये वाढती रुची दिसून येत आहे. संस्कृत आणि लॅटिनसारख्या प्राचीन भाषा या एकाच भाषाकुटुंबातील आहेत. यावरून हे सिद्ध होते की आमचे संबंध केवळ राजनैतिक नसून, त्यांना सामायिक वारसा आहे
पुढील वर्षी, भारत आणि इटली यांच्यातील संबंधांच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त एक ‘सांस्कृतिक वर्ष’ साजरे केले जाईल. यामुळे आपले सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होतील. इटलीमध्ये मोठ्या संख्येने रहात असलेली भारतीय वंशाची माणसे आपल्या संबंधांमधील एक महत्त्वाचा दुवा आहेत. त्यांची काळजी घेतल्याबद्दल मी पंतप्रधान मेलोनी आणि इटलीच्या लोकांनी मनःपूर्वक आभार मानतो.
स्थलांतर आणि गतिशीलता भागिदारी यासंदर्भात तीन वर्षांपूर्वी झालेल्या करारामुळे दोन्ही देशांमधील लोकांची ये-जा वाढली आहे.
महामहिम,
आज झालेल्या अत्यंत उपयुक्त बैठकीबद्दल आणि तुमच्या मैत्रीबद्दल मी पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. 140कोटी भारतीयांच्या वतीने, मी तुम्हाला भारताला भेट देण्याचे पुन्हा एकदा आमंत्रण देतो.
खूप खूप धन्यवाद।
ग्राज़िये मिले!!
निलीमा चितळे/राजश्री आगाशे/राजेश शिरभाते/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai